पुणे – केंद्रीय भूमी जल बोर्डाच्यावतीने पुणे जिल्ह्याचा भूजल व्यवस्थापन आराखडा तयार करण्यात आला असून यामध्ये पावसाचे पाणी जिरविण्यासाठीचे कामे तसेच पाझर तलावांची सुमारे दीड हजार कामे भूजल आराखड्यामध्ये सुचविण्यात आली आहेत. हा आराखडा पुणे येथील राज्य कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना सादर केला.
यावेळी बोर्डाचे वैज्ञानिक आणि प्रभारी अधिकारी डॉ. जे. देविथुराज, वैज्ञानिक सूरज वाघमारे, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा पुणेचे वरिष्ठ भूवैज्ञानिक संतोष गावडे, पुणे पाटबंधारे प्रकल्प मंडळाच्या उप अधीक्षक अभियंता अंजली काकडे, कुकडी पाटबंधारे मंडळाच्या उप अधीक्षक अभियंता श्वेता पाटील, जिल्हा परिषद छोटा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता पांडुरंग कांजाळकर, जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे भूवैज्ञानिक प्रकाश बेडसे आदी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी बोर्डाने केलेला आराखडा पाटबंधारे विभाग, जीएसडीए, लघु पाटबंधारे, कृषी विभाग आदी शासकीय विभागांबरोबरच साखर कारखाने, कृषी केंद्र यांनाही उपलब्ध करून देण्याच्या सूचना केल्या आहेत.
यावेळी डॉ. देविथुराज यांनी आराखड्याचे संगणकीय सादरीकरण केले. ते म्हणाले की, केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाचा जलधर नकाशे तयार करण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत हे काम करण्यात आले आहे. 2015-16 मध्ये दोन तालुके 2017-18 मध्ये तीन आणि 2018-19 मध्ये आठी तालुक्यांचे “ऍक्वाफर मॅपींग’ करण्यात आले आहे.
उपाययोजनांबाबतही सखोल अभ्यास… केंद्रीय भूमी जल बोर्डाने केलेल्या या आराखड्यामध्ये पर्जन्यमान, जलधर प्रणालीचे प्रकार व वैशिष्ट्ये, सिंचन आणि ऊसासारख्या नगदी पिकांसाठी भूजल उपशाचा भूजलावर येणार ताण, मर्यादित उपलब्धता, भूजल पातळीतील घट-वाढ, मान्सूनपूर्व आणि मान्सूनपश्चात भूजलपातळी, भूजल गुणवत्ता, जिल्ह्यातील भूगर्भस्थिती, माती व जमीनीचा वापर आदींबाबत अभ्यास करण्यात आला आहे.