राजगुरूनगरात बाजार समितीच्या कचऱ्यामुळे डासांचा प्रादुर्भाव
राजगुरूनगर – शहरात मराठा आरक्षण मिळावे यामागणीसाठी सुरू असलेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनकर्त्यांना मच्छर चावल्याने डेंग्यू, मलेरिया सारख्या आजाराला तोंड द्यावे लागत आहे. राजगुरूनगर नगरपरिषदेकडे मागणी करूनही औषध फवारणी केली जात नाही याचा आंदोलनकर्त्यांनी तीव्र निषेध केला आहे.
राजगुरूनगर शहरात खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या समोर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मराठा आरक्षण मिळण्यासाठी बेमुदत साखळी उपोषण 1 ऑक्टोबर पासून सुरू केले असून मंगळवारी (दि. 10) दहावा दिवस आहे. खेड तालुक्यातील जवळपास सर्वच गावांचा या आंदोलनाला पाठिंबा मिळत असून गावागावातील तरुण दरदिवशी साखळी उपोषणात सहभागी होत आहेत.
क्रांती मोर्चाचे अध्यक्ष मनोहर वाडेकर, समन्वयक अंकुश राक्षे, दिलीप होले, शंकर राक्षे, ऍड. निलेश आंधळे, ऍड. अनिल राक्षे आदींसह विविध गावातील नागारिक आंदोलनात सहभागी होत आहेत. तर आंदोलनात सहभागी होणाऱ्याना मच्छरांचा मोठा सामना करावा लागत आहे.
शहरात डेंग्यूची साथ आहे. तर बाजार समितीच्या परिसरात पडलेली सडलेली भाजी, साठलेले पाणी, कचरा आणि घाण यामुळे मच्छांचा प्रादुर्भाव वाढला आहे. या परिसरातील कचरा उचलावा. स्वच्छता ठेवून परिसरात औषध फवारणी करावी, याबाबत नगरपरिषदेला पत्रव्यवहार केला; मात्र नगरपरिषदेने आंदोलकांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले आहे. अधिकारी सांगतात कर्मचारी पाठवतो; मात्र कर्मचारी इकडे फिरकत नाहीत.
– अंकुश राक्षे समन्वयक, क्रांती मोर्चा