सेझमधील कंपनीकडून ट्रॅक्टरद्वारे टाकले जातेय दूषित पाणी
राजगुरूनगर – रेटवडी (ता. खेड) गावाच्या हद्दीत सेझमधील एका कंपनीतील केमिकलयुक्त मैला पाणी ट्रॅक्टरद्वारे आणून थेट ओढ्यात सोडण्यात येत आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून शेती नापिक होण्याच्या मार्गावर आहे.
विहिरीमध्ये या पाण्याचा अंश उतरण्याची मोठी भीती आहे. या केमिकलयुक्त मैला पाण्याची कंपनी प्रशासनाने दुसरीकडे विल्हेवाट लावावी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी दिला आहे.
खेड तालुक्याच्या पूर्व भागात सेझ अंतर्गत कनेरसर, निमगाव, रेटवडी परिसरातील माळरानावर अनेक कंपन्या आहेत. रेटवडी हद्दीतील मार्श कंपनीचे केमिकल युक्त पाणी, मैला तीन महिन्यांपासून डोंगरालगतच्या ओढ्यात टाकण्यात येत आहे.
दोन दिवसांपासून पाऊस पडत आहे. ओढ्याचा नैसर्गिक प्रवाह रेटवडीच्या दिशेने असल्यामुळे ओढ्याला पूर येऊन केमिकलयुक्त मैला थेट शेतातील उभ्या पिकांत जात आहे. या पाण्याचा अंश ओढ्या लगतच्या विहिरीमध्ये उतरला आहे. विहिरीचे पाणी दूषित झाले आहे.
केमिकलच्या पाण्यामुळे विहिरी, हातपंप दूषित होत आहेत. कंपनी प्रशासनाला ग्रामपंचायतीच्या माध्यमातून तक्रार केली आहे. केमिकलयुक्त मैला रेटवडी हद्दीत टाकू नये अन्यथा कंपनीसमोर आंदोलन करण्यात येईल.
– किरण पवार, सदस्य, रेटवडी ग्रामपंचायत
शेतात पाणी गेल्याने पायाला सुटतेय खाज
कंपनीचा केमिकल युक्त मैल पाणी शेतात गेल्यामुळे शेतात काम करताना शेतकऱ्यांच्या पायाला खाज सुटली आहे. माळरानातील झाडे जळून जात आहेत. जनावरांचा डोंगरदऱ्यातील चारा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे, असे सरपंच माया थिटे, किरण पवार, अतुल थिटे, पालिस पाटील उत्तम खंडागळे, नामदेव डुबे,रमेश डुबे यांच्यासह शेतकऱ्यांनी सांगितले.