पुणे – पुण्याहून नाशिकला जाणारी एकमेव भुसावळ-पुणे-भुसावळ हुतात्मा एक्सप्रेस पुढील दोन महिने बंद राहणार असल्यामुळे नाशिकला जाणाऱ्या प्रवाशांनी मोठी गैरसोय होणार आहे. रेल्वे प्रशासनाने हुतात्मा एक्स्प्रेस बंद न ठेवता वेळेत बदल करून सुरू ठेवावी अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.
कर्जत रेल्वे स्थानकात रिमॉडेलींगचे काम हाती घेण्यात आले आहे. यामुळे (दि. 28 जानेवारी ते दि. 31 मार्च) दरम्यान हुतात्मा एक्सप्रेस दोन महिने बंद राहणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. दररोज हजारो नागरिक पुणे ते नाशिक प्रवास करतात. पुण्याहून नाशिकला जाणाऱ्या प्रवाशांसाठी हुतात्मा एक्स्प्रेस ही एकमेव रेल्वे आहे.
पण, आता रेल्वे प्रशासनाने हुतात्मा एक्स्प्रेस रद्द केल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे. पुण्याहून नाशिकसाठी एकही रेल्वे नसल्यामुळे प्रवाशांना कल्याण पर्यंत इतर रेल्वेने प्रवास करून नंतर पुन्हा रेल्वे बदलून नाशिकपर्यंतचा प्रवास करावा लागणार आहे. यात प्रवाशांचा वेळ आणि पैसे अधिक खर्च होणार आहेत.