पुणे – सणाच्या काळात दुकाने बंद असल्याने शहरातील व्यापारी वर्ग आर्थिक संकटात सापडले आहेत. गेले दीड महिने शहरातील व्यापारी पेठ बंद असून, ३१ मे नंतर शहरातील व्यापारी दुकाने खुली ठेवण्यास मुभा द्याावी, अशी मागणी पुणे व्यापारी महासंघाकडून करण्यात आली आहे.
याबाबत व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका, सचिव महेंद्र पितळीया यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री अजित पवार यांना नुकतेच निवेदन दिले आहे. करोनाचा संसर्ग वाढीस लागल्यानंतर पाच मेपासून शहरातील जीवनावश्यक वस्तुंची दुकानेवगळता सर्व दुकाने बंद करण्यात आली.
गुढीपाडवा, अक्षय्य तृतीया तसेच रमजान ईद या सणांच्या कालावधीत व्यापारी दुकाने बंद होती. सणासुदीच्या काळात व्यापार बंद असल्याने व्यापारी आणि पर्यायाने कर्मचारी वर्गासमोर संकट उभे राहिले आहे. राज्यातील व्यापारक्षेत्राला कोट्यवधी रुपयांचा फटका बसला आहे, असे रांका आणि पितळीया यांनी सांगितले.
गेले दीड महिने दुकाने बंद आहेत. या कालावधीत व्यापाऱ्यांनी कर्मचाऱ्यांचा विचार केला. त्यांना वेतन दिले. परंतू, यापुढील काळात कर्मचाऱ्यांचचे वेतन देणे अशक्य होणार आहे. व्यापार बंद असल्याने कर्मचाऱ्यांचे वेतन कसे करणार, हा देखील प्रश्न आहे. पर्यायाने अनेकांवर बेराजगार व्हावे लागेल.
व्यापारी, कर्मचारी, त्यांचे कुटुंबीय संकटात सापडले आहेत. ३१ मे नंतर निर्बंध शिथिल करण्याची गरज आहे. दुकाने खुली ठेवण्यास परवानगी देण्याची गरज असून नियमावलीचे पालन करून व्यापार सुरू केला जाईल. बाजारपेठांवर निर्बंध असताना ई-कॉमर्स कंपन्याकडून चैनीच्या वस्तुंची विक्री सुरू आहे. व्यापाऱ्यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून प्रशासनास सहकार्य केले आहे, असे त्यांनी सांगितले.