गावखेड्यांत शिक्षण गुणवत्तेची ऐशी की तैशी…
पुणे : जिल्हा परिषदेच्या 653 शाळांमधील वीस टक्क्यांहून कमी विद्यार्थ्यांना वाचन करता येत नसल्याची माहिती पडताळणीतून समोर आली आहे. जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षणाची गुणवत्ता ढासळत असल्याची गंभीर दखल मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी घेतली. त्यानंतर केंद्रप्रमुखांची बैठक घेत 653 शाळांतील मुलांची 30 मे पर्यंत विशेष अभ्यासक्रमाद्वारे गुणवत्ता सुधारण्याचे आदेश आयुष प्रसाद यांनी शिक्षण विभागाला दिले आहे.
जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थेतर्फे (डाएट) शाळांच्या गुणवत्तेबाबत पडताळणी करण्यात आली. जिल्ह्यामध्ये “निपुण भारत अभियान’ राबविण्यात येत असून, त्याअंतर्गत 3 हजार 638 शाळांमध्ये गुणवत्ता सुधारण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. मात्र त्यात प्रगती झालेली दिसून येत नाही. झेडपीच्या प्राथमिक शाळांमधील एक लाख 46 हजार 558 विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करण्यात आले.
899 शाळांमधील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत सुधारणा झाली. जिल्ह्यातील 1 हजार 62 शाळांची गुणवत्ता चांगली असल्याचे दिसून आले.
या सर्व पार्श्वभूमीवर शाळांच्या गुणवत्ता सुधारणा न झालेल्या 45 केंद्रप्रमुख आणि मुख्याध्यापकांना रविवारी जिल्हा परिषदेत बोलावण्यात आले होते. यावेळी त्यांनी पुढील कामकाजाबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
जूनमध्ये पुन्हा सर्वेक्षण
केंद्र प्रमुखांसह झालेल्या आढावा बैठकीत चांगली कामगिरी न केलेल्या 653 शाळांतील विद्यार्थ्यांसाठी पुन्हा 31 मेपर्यंत अभ्यासक्रम राबवला जाईल. त्यानंतर संबंधित विद्यार्थ्यांचे जूनमध्ये पुन्हा सर्वेक्षण केले जाईल. यात अध्यापनात प्रभावी असलेले शिक्षकांची मदत घेऊन या शाळांतील मुलांसह शिक्षकांना मार्गदर्शन केले जाणार आहे, अशी माहिती आयुष प्रसाद यांनी “प्रभात’ला दिली.