मुंबई – देशात कोविडशी लढण्यासाठी बनारस मॉडेल एक मोठे मॉडेल बनवतील, असा प्रचार सुरु आहे. मात्र आम्हाला वाटते अपयश लपवण्यासाठी हा प्रचार सुरु आहे. बनारसच्या घाटावर तर मृतदेहांवर अंतिम संस्कार करण्यासाठी जागा नव्हती, असा टोला लगावित राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला.
करोना संक्रमणाविरूद्ध लढण्यासाठी बनारस मॉडेलचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले होते. तसेच गुजरात सरकारने वाराणसीकडून शिकले पाहिजे. देशातील बरीच राज्ये आणि शहरांच्या तुलनेत बनारसमध्ये कोणतीही समस्या उद्भवली नाही.
ऑक्सिजनच्या बाबत देखील तेथे कमतरता जाणवली नाही. तेथील रुग्णालयालाही काही त्रास झाला नसल्याचे मोदी म्हणाले होते. या पार्श्वभूमीवर देशात बनारस मॉडेल चर्चेत आले. पण या मॉडेलवरून आता राजकारण होत आहे. राष्ट्रवादीचे नेते, राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी अपयश लपवण्यासाठी हा प्रचार सुरु असल्याचे म्हटले आहे.
मलिक म्हणाले, बनारस मॉडेलमध्ये कोणतेही टेस्टिंग किंवा उपचार नाहीत. तेथे औषधांची देखील टंचाई जाणवली. तसेच ऑक्सिजन देखील ब्लॅकमध्ये विकले गेले होते. बनारस मॉडेल हे अयशस्वी मॉडेलशिवाय काहीच नसल्याचे ते म्हणाले.
लोकांनी नदीत मृतदेह सोडले, त्याची देशभर चर्चा झाली. आता पंतप्रधान म्हणतात आम्ही बनारसचे जिल्हाधिकारी, तिथले डॉक्टर, रूग्णालयात काम करणाऱ्या लोकांशी संवाद साधू, असा शाब्दीक चिमटा देखील त्यांनी काढला.