– अनामिका
एका तळ्यात होती बदके पिले सुरेख…
हे गीत सर्वांनी ऐकलंय. राजहंसाचे एक पिलू कमकुवत, अपंग, कुरूप होते म्हणून हेटाळले उपेक्षिले गेले; नाकारले, धिक्कारले गेले; पण एके दिवशी पाण्यात प्रतिबिंब पाहताना त्याच्या लक्षात आले, “आपण कुरूप जरूर आहोत पण बदक नक्कीच नाही. आपण एक राजहंस आहोत. “तेव्हा त्याचे दुःख कमी झाले, स्वतःस हीन लेखणे बंद झाले आणि तो राजहंसाच्या थव्यात मिसळला.
माणसाचेही असेच असते. जोपर्यंत त्याला स्वतःचा शोध लागत नाही, आपण कोण, कशासाठी जन्मलो? याचा शोध लागत नाही, तोपर्यंत तो दिशाहीन भटकतो, अंधारात चाचपडतो, पण जेव्हा त्याला स्वअस्तित्वाचा शोध लागतो तेव्हा त्याचे भरकटणे थांबते, त्याचे मन शांत होते. योग्य दिशेने तो जीवनाचा मार्ग चालतो अन् जीवन यशस्वीपणे जगतो.
पण हा स्वतःचा शोध एका रात्रीत लागत नाही बरं का! यासाठी प्रथम स्वतःची
स्वतःला ओळख असावी लागते. त्या ओळखीतून पुढे स्वतःशी मैत्री अन्
स्वतःवर प्रेम करायला शिकावे लागते आणि मग “स्व’ ला शोधावे लागते. मग या “स्व’ वर संस्कार करावे लागतात, त्याला तासावे लागते मग हा “स्व’ चमकायला लागतो.
बऱ्याचदा “स्व’चा शोध लागल्यावर “अहं’ची बाधा लागून “स्व’ झाकोळला जातो, कलुषित होतो. त्यासाठी मनावर ताबा ठेवावा लागतो आणि प्रयत्नपूर्वक या “अहं’ला जाणीवपूर्वक दूर ठेवावे लागते. अशा “स्व’चा प्रकाश मग इतरांनाही उपयोगी पडतो, प्रकाशित करतो, स्वतः आनंदी राहतो आणि जगही आनंदित करतो.