नवी दिल्ली – स्वातंत्र्यांचा अमृत महोत्सव देशभरात उत्साहात साजरा केला जातो आहे. हर घर तिरंगा मोहिमेसोबतच विविध शहरांत रॅली काढल्या जात आहेत. मात्र या उत्साहावर विरजण टाकण्यासाठी दहशतवादीही टपून बसले असल्यामुळे गुप्तचर विभागाने अलर्ट जारी केला आहे. राजधानी दिल्लीत विशेष खबरदारी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहे.
आयबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पंजाब बॉर्डरवर सीमेपलीकडून ड्रोनच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात स्फोटके पाठवण्यात आली आहेत. इतकेच नाही तर ती देशातल्या वेगवेगळ्या शहरांत पोहोचवण्यातही आली आहेत. गेल्या काही दिवसांत दहशतवाद्यांची धरपकड करण्यात आली आहे. त्यात मोठ्या प्रमाणात आयईडी अगोदरच भारतात पाठवण्यात आले असल्याची कबुली या दहशतवाद्यांनी चौकशी दरम्यान दिली असल्याची माहिती एका इंग्रजी माध्यामाने सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे.
शस्त्रे, एके 47 सारखी हत्यारेही पाठवली गेली आहेत. त्याशिवाय एकाकी दहशतवाद्याकडूनही हल्ला केला जाण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. गर्दीच्या ठिकाणी अशा एकट्या दहशतवाद्याकडून असा अचानक हल्ला होऊ शकतो असे इनपूट आयबीने दिले आहेत. त्यामुळे एकदम कडक आणि काटेकोर तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
हल्ल्यासाठी पतंगांचाही वापर?
हल्ला करण्यासाठी पतंग वापरले जाण्याचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळेच लाल किल्ल्याच्या परिसरात पतंगबाजीवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली असून त्यावर नजर ठेवली जाते आहे.