नवी दिल्ली: पोलिसांच्या तपासकार्यामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानावर आधारीत प्रणालींचा अवलंब होणे गरजेचे आहे. पोलिसांच्या तपासामधून गुन्हेगारांचा गुन्हा सिद्ध होण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. ही गोष्ट क्लेषदायक आहे. त्यामुळे दबावतंत्र असलेले “थर्ड डिग्री’ तंत्र सोडून फॉरेन्सिक तंत्राचा अवलंब होणे गरजेचे आहे, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटले आहे. पोलिस संशोधन आणि विकास कार्यालयाच्या 49व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये ते बोलत होते.
संस्थात्मक परिणामकारक पद्धती आणि उत्कृष्ठ पोलिस हे इतरांसमोर आदर्श असतात. कॉन्स्टेबलपासून डीजीपीपर्यंत प्रत्येकाने स्वत:ची भूमिका स्पष्ट ठेवणे गरजेचे आहे, असे शहा यांनी म्हटले आहे. “बीपीआरडी’ने राज्य आणि केंद्रीय पातळीवरील आपल्या कार्यपद्धतीमध्ये बदल करणे आवश्यक आहे. ज्या गुन्ह्यांमध्ये शिक्षेचा कालावधी 7 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक असलेल्या गुन्ह्यांच्या तपासामध्ये फॉरेन्सिक यंत्रणांचा अवलंब अनिवार्य करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. फॉरेन्सिक पुरावा सादर केल्यास न्यायाधीश आणि बचाव पक्षापुढे कोणताही पर्याय शिल्लक राहत नाही. त्यामुळे या तपास यंत्रणांवर भर देणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने “बीपीआरडी’ने चर्चेची प्रक्रिया सुरू करावी, अशी सूचना केंद्रीय गृहमंत्रालयाने दिली आहेत. या संदर्भातील सर्व सूचना केंद्रीय गृहमंत्रालयाकडे पाठवण्यात याव्यात असेही अमित शहा यांनी सांगितले.
यावेळी राज्यमंत्री जी. किशन रेड्डी प्रमुख पाहुणे होते. गृहमंत्री शहा यांनी सेवेमध्ये उत्तीर्ण झालेल्या तसेच संशोधन विकास आणि पोलिस दलाच्या आधुनिकीकरणासाठी परिणामकारक योगदान देणाऱ्या अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. शहा यांनी 50 वर्षांच्या कारर्कीदीत बीपीआरडीने केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल आणि पोलिस सुधारणा आणि प्रशिक्षणाबद्दल गौरवोद्गार काढले.