हैदराबाद – तेलंगणातील (Telangana election) सत्तारूढ पक्षाने नाव बदलून भारत राष्ट्र समिती (BRS) हे नाव धारण केले. यूपीएचेही इंडिया आघाडी (India aghadi) असे नवे नामकरण करण्यात आले. पण, नावे बदलल्याने त्यांच्या भ्रष्टाचार, कुशासन आणि मतपेढीच्या राजकारणाचा इतिहास कधीच बदलणार नाही, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी त्यांच्यावर निशाणा साधला.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारधुमाळीत सहभागी होत मोदींनी शनिवारी तेलंगणात सभा घेतली. एकमेकांना लक्ष्य करत असले तरी बीआरएस आणि कॉंग्रेसमध्ये संगनमत आहे. त्या दोन्ही पक्षांपासून तेलंगणातील जनतेला मुक्ती हवीय. देशातील अनेक राज्यांमधील जनतेने कॉंग्रेसला याआधीच सत्तेतून हद्दपार केले आहे. तेलंगणात भाजपला अनुकूल वारे वाहत आहे.
राज्यातील जनता बीआरएसला सत्तेवरून दूर करेल, असा विश्वास त्यांनी बोलून दाखवला. भाजपचा जाहीरनामा म्हणजे गरीब, शेतकरी, दलितांच्या आकांक्षांचे प्रतीक आहे. कॉंग्रेसला मत दिल्यास बीआरएस आणखीच मजबूत होईल. बीआरएसला पराभूत करण्यासाठी भाजप हाच सर्वांत विश्वासार्ह पर्याय आहे, असे ते मतदारांना उद्देशून म्हणाले.
कामारेड्डीत सभा घेऊन मोदींनी एकप्रकारे थेट मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव आणि कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष ए.रेवंथ रेड्डी यांना आव्हान दिले. राव आणि रेड्डी हे तेलंगणातील प्रमुख नेते कामारेड्डी मतदारसंघातून एकमेकांविरोधात निवडणूक लढवत आहेत. त्या बिग फाईटमध्ये भाजपचे उमेदवार व्यंकटरमण रेड्डी नशीब आजमावत आहेत.