पंतप्रधानाच्या दिवे लावण्याच्या आवाहनास नागरिकांचा संमिश्र प्रतिसाद
जुन्नर (प्रतिनिधी) – देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार आज (रविवार-दि. ५) रात्री ९ वाजता दिवे लावून एकजुटीचा संदेश देण्यासाठी अनेकांनी तयारी सुरु केली आहे तर अनेकजण या दिव्यातून काय सध्या होणार आहे, हा प्रश्न विचारत आहेत. आज रात्री नऊ वाजता नऊ मिनिटांसाठी नागरिकांनी आपल्या घरातील सर्व दिवे बंद करावेत आणि पणत्या, मेणबत्ती किंवा मोबाईलचा फ्लॅश लावून घरात, बाल्कनीत झगमगाट करावा, असे आवाहन मोदी यांनी देशवासीयांना केले आहे.
यापूर्वीही २२ मार्च रोजी त्यांनी थाळी वाजवण्याचे आवाहन केले होते, त्यावेळीही नागरिकांनी जोरदार प्रतिसाद दिला होता. हा दिव्यांचा झगमगाट करताना नागरिकांनी रस्त्यावर येवू नये, तसेच सोशल डिस्टन्स पाळावे, असेही त्यांनी सांगितले आहे.
संकट काळात लढण्यासाठी हि सामुहिक महाशक्तीचा नक्कीच फायदा होणार असून करोना सोबतच्या लढाईत सर्वांचा आत्मविश्वास उंचावणार असल्याचा संदेश या अनोख्या उपक्रमामागे असल्याचे मोदी यांनी सांगितले. ही एक प्रकारची जनजागृती असून या लक्ष लक्ष दिव्यांतून एक नवीन उर्जा व आत्मविश्वास प्राप्त होणार असल्याचे मोदी यांनी सांगितले होते. या लढाईत सर्व नागरिकांनी घरातच राहून प्रशासनाला सहकार्य केले असून या पुढेही काही दिवस असेच सहकार्य अपेक्षित असल्याचे ते म्हणाले.
तर दुसरीकडे या दिव्यांवरून अनेकांनी टीका केली असून या उपक्रमातून काय सध्या होणार, असा प्रश्न विचारला आहे. देशातील आरोग्य व्यवस्थेवर बोलायचे सोडून नागरिकांचे लक्ष दुसरीकडेच वेधण्याचा प्रयत्न होत असल्याचे काहींचे मत आहे. काय दिवे लावायचे ते लावा मात्र हाताला सॅनेटायझर लावून दिव्यांच्या जवळ जावू नका, धर्मशास्त्रात दिव्यांना अनन्यसाधारण महत्व असून आम्ही दिवे लावणारच, या सर्वांमागे नऊ या शुभंकाचे महत्व आहे तर हा देश म्हणजे इव्हेंट कंपनी आहे आदी विविध पोस्ट आज सोशल माध्यमांवर व्हायरल होत आहेत.
देशाच्या पंतप्रधानांनी केलेल्या सूचनांमागे निश्चितच काहीतरी सकारात्मक भूमिका असून नागरिकांनी त्यावर टीका करण्याऐवजी या करोना संकटास सर्वांनी एकजुटीने सामोरे जावे, असे आवाहन शिरूर मतदार संघाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केले आहे.
देशात दाटलेल्या अंधकाराचे निवारण होण्यास सर्वांनी आज पणत्या, मेणबत्या लावून या करोना विषाणूला परतवून लावण्याचा निर्धार करूयात, अशी प्रतिक्रिया जुन्नर तालुक्याचे माजी आमदार शरद सोनावणे यांनी दिली आहे.