पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहराला फेब्रुवारी 2022 अखेरपर्यंत दररोज पाणीपुरवठा केला जाणार आहे. यापूर्वी प्रशासनाकडून डिसेंबर 2021 अखेरपर्यंत दररोज पाणीपुरवठा सुरू होईल, असे सांगण्यात आले होते. परंतु आता दिवसाआड पाणीकपात फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले.
फेब्रुवारी अखेरपर्यंत दैनंदिन पाणी पुरवठा करण्याच्या दृष्टीने शहरात तयारी करून पाणीपुरवठा विभाग नियोजन करीत आहे, असे महापालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांनी स्पष्ट केले.
पाणी पुरवठ्यासंदर्भात महापौर माई ढोरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्या बैठकीत आयुक्त बोलत होते. या वेळी उपमहापौर हिराबाई घुले, शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे, मनसेचे गटनेते सचिन चिखले, पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख प्रवीण लडकत व अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत पदाधिकारी व गटनेत्यांनी संपूर्ण शहरात पुरेशा प्रमाणात पाणी देण्याची आग्रही मागणी केली. आयुक्त पाटील म्हणाले, उपलब्ध पाण्याद्वारे संपूर्ण शहरात दररोज एकवेळ पाणी देण्याचे नियोजन आहे. पाण्याच्या टाक्या व वितरण व्यवस्था पूर्ण करून फेब्रुवारी अखेरपर्यंत संपूर्ण शहराला दररोज पाणी दिले जाईल. तसेच, शहरातील काही भागांत 24 तास पाणी देण्यात येणार आहे. त्याची सुरुवात करण्यात आली आहे. आंद्रा व भामा आसखेड धरण पाणी योजनेतून शहराला 100 एमएलडी पाणी पुढील महिन्यात मिळणार आहे. त्यामुळे वितरण व्यवस्था आणखी सक्षम होऊन अधिक पाणी मिळणार आहे.
महापौर ढोरे म्हणाल्या, संपूर्ण शहरात व्यवस्थितपणे व योग्य प्रकारे पाणीपुरवठा करा. पाण्याबाबत नागरिकांच्या तक्रारी वाढत आहेत. त्या तातडीने दूर करा. त्या पद्धतीने उपाययोजना करा. शिवसेना गटनेते म्हणाले की, गेल्या 5 वर्षांत सत्ताधाऱ्यांना आंद्रा व भामा आसखेड योजना राबविता आली नाही. शहराला 24 तास पाणी देण्यात अपयश आले आहे.
नागरिकांना दररोज पाणी द्या, ही आमची मागणी आहे.
मनसेचे गटनेते चिखले म्हणाले की, टप्पाटप्पाने काही भागात दररोज पाणी न देता संपूर्ण शहराला दररोज पाणी द्या. पाणीपुरवठ्यांच्या कामांवर कोट्यवधींचा खर्च केला जात आहे. मात्र, त्याचा नागरिकांना काहीच फायदा होत नसल्याचे त्यांनी सांगितले.