- पवना व इंद्रायणी नद्यांच्या पाणी पातळीत वाढ
पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहर व परिसरात गेल्या काही दिवसांपासून दमदार पाऊस पडत आहे. त्याचप्रमाणे मावळातही पावसाने चांगली हजेरी लावली आहे. परिणामी पवना व इंद्रायणी नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. पवना धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढला असून, धरणाची पाणी पातळी 97 टक्क्यांवर पोहोचली आहे. धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू केला असून, नदी पात्रातील पाण्याची पातळी झपाट्याने वाढत असल्यामुळे महापालिकेची आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या वर्षी पावसाने चांगलेच थैमान घातले होते. शहराने महापुराचा कटू अनुभव घेतला होता. गेल्या वर्षी तब्ब्ल 10 हजारांहून अधिक कुटुंबांना स्थलांतरित करावे लागले होते. हा अनुभव डोळ्यांसमोर ठेवून पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज आणि सतर्क ठेवली आहे.
याबाबत अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील म्हणाले, मुळशी धरणातून 18 हजार क्युसेक्स आणि पवना धरणातून 3 ते 4 हजार क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग झाल्यास पवना आणि इंद्रायणी नद्यांची पाण्याची पातळी वाढते. याचा अनुभव पाठीशी असल्याने यंत्रणा कार्यान्वित केली आहे. मावळ तालुक्यातील वडिवळे धरणातून येणारे पाणीही पवना आणि इंद्रायणी नद्यांमध्ये मिळते. या तीन धरणांतील पाणीसाठा वाढला आणि विसर्ग सुरू झाल्यानंतर महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला सतर्क रहावे लागते. ही बाब लक्षात घेऊन महापालिका सर्व आव्हानांना तोंड देण्यासाठी सज्ज झाली आहे.
गेल्या वर्षी पिंपरी-चिंचवड शहराला पवना नदीची पाणी पातळी वाढल्याने आणि पावसाचे प्रमाण जास्त राहिल्याने पुराचा फटका बसला. अनेक नागिरकांना स्थलांतरित करावे लागले. हा अनुभव लक्षात घेऊन आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आपण सद्यःस्थितीमध्ये करोना महामारीचा सामना करीत आहोत. अनेक महापालिकेच्या शाळा आपण विलगीकरण केंद्र म्हणून वापरल्या आहेत. त्यामुळे पुराचा फटका बसणाऱ्या भागातील 20 शाळा निर्जंतुकीकरण करून ताब्यात घेतल्या आहेत. काही खासगी शाळांनाही गरज भासल्यास उपलब्ध करून देण्याच्या सूचना संबंधित संस्थाचालकांना देण्यात आल्या आहेत. या वेळी फिजिकल आणि सोशल डिस्टन्सिंग पाळावे लागणार आहे.
पवना धरणाचे सहा दरवाजे उघडले – शेटे
मावळ तालुक्यासह पिंपरी-चिंचवड शहराचे पाण्याचे मुख्य स्त्रोत असलेले पवना धरण 98 टक्के भरले आहे. पवना धरण परिसरात दिवसभरात 82 मीमी पावसाची नोंद झाली असून 1 जूनपासून 1543 मीमी पावसाची नोंद झाली आहे. तर रविवारी सकाळी 10 वाजल्यापासून पवना धरणाचे आर्धा फुटाने सहा दरवाजे उघडून 2200 क्युसेकने विसर्ग सुरू करण्यात आला आहे. धरण प्रशासनाच्या वतीने पवना नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्यास नदीपात्रात विसर्ग वाढविण्यात येईल, असे पाटबंधारे विभागाचे उपभियंता अशोक शेटे यांनी सांगितले आहे.
पवना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. नदीकाठच्या नागरिकांना, नदीपात्रालगतच्या झोपडपट्ट्या तसेच इतर पत्राशेड यांना पाण्याची पातळी वाढण्यापूर्वीच स्थलांतरित केले जाणार आहे. शहराला 1982, 1985, 2007 आणि 2019 या वर्षी पुराचा फटका बसलेला आहे. आपत्ती व्यवस्थापन पथक, एनडीआरएफ टीम, सामाजिक कार्यकर्ते, सामाजिक संस्था या सर्वांशी यंदा सुरुवातीपासूनच समन्वय ठेवण्यात आलेला आहे.
-संतोष पाटील
अतिरिक्त आयुक्त, पिंपरी-चिंचवड