– प्रतिनिधी
लेखिका व सामाजिक कार्यकर्त्या सुनीता देशपांडे या साहित्यिक पु. ल. देशपांडे यांच्या पत्नी, ही त्यांची ओळख असली तरी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू होते. त्यांचा जन्म 3 जुलै 1926 रोजी रत्नागिरी येथे झाला. त्यांचे माहेरचे नाव सुनीता ठाकूर असे होते. त्यांचे वडील सदानंद ठाकूर हे रत्नागिरीतील निष्णात फौजदारी वकील होते. ते मूळचे धामापूरचे. सुनीताबाईंच्या लिखाणामधे धामापूरच्या तलावाचे वर्णन आहे. हे ठिकाण आता नौकाविहारासाठी पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध झाले आहे. “सोयरे सकळ’ मध्ये त्यांनी तर यक्षाचे तळे असे धामापूरच्या तलावाला म्हटले आहे.
कॉंग्रेसमध्ये असलेले सुनीताबाईंचे मामा राजा पाटेकर यांनी अण्णासाहेब सहस्रबुद्धे यांच्याशी सुनीताबाईंचा परिचय करून दिला. सुनीताबाई सेवादलात सक्रिय झाल्या होत्या. सहस्रबुद्धे यांनी वर्ष 1942 साली भूमिगत रेडिओ सुरू करण्याची जबाबदारी सुनीताबाईंवर सोपवली होती, पण ते काम पूर्णत्वास गेले नाही. त्यांच्यावर टाइम बॉम्ब बनविण्याचे काम सोपविण्यात आले होते. त्यांनी मोर्चाचे नेतृत्वही केले होते. सुनीताबाईंनी बंगाली आणि उर्दू भाषांचाही अभ्यास केला होता. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्या मुंबईला आल्या. जुवळे नावाचे एक शिक्षणप्रेमी दादर भागात ओरिएंट हायस्कूल चालवीत होते. तेथेच सुनीताबाईपण शिक्षिका म्हणून हजर झाल्या.
भाई अर्थात पु.ल. पण शिक्षक म्हणून नोकरी करीत होते. त्यावेळी पुलंच्या वर्गात बाळ ठाकरे त्यांचे विद्यार्थी होते तर सुनीताबाईंच्या वर्गात श्रीकांत ठाकरे होते. शिक्षक म्हणून काम करत करत दोघांची ओळख वाढत गेली व त्याचे रूपांतर प्रेमात होऊन त्यांनी लग्न करायचे ठरविले. पुलंनी पुढाकार घेऊन त्यांना लग्नाबाबत विचारणा केली. त्यांना लग्न हे कृत्रिम बंधन वाटत होते मात्र पु. ल. देशपांडे यांचा स्वभाव व वैचारिक गोष्टी यामुळे सुनीताबाईंनी विवाहाला होकार दिला. या विवाहावेळी धामापूरची आजी त्यांच्या मागे खंबीरपणे उभी राहिली.
शाळेला उन्हाळ्याची सुट्टी लागल्यावर सुनीताबाई रत्नागिरी येथे आल्या. घरची परवानगी मिळाल्यावर पु. ल. रत्नागिरीस आले. गप्पाष्टकामधे पुलंनी आपल्या विनोदी स्वभावाने सुनीताबाईंच्या माहेरच्या लोकांना प्रभावित केले. त्यांचा विवाह नोंदणी पद्धतीनेच 12 जून 1946 रोजी संपन्न झाला. सुनीता देशपांडे यांनी “आहे मनोहर तरी’ या आत्मचरित्रामधून त्यांच्या व पुलंच्या जीवनावर सुरेख प्रकाश टाकला आहे. सुनीताबाईंची राहणी अत्यंत साधी होती. त्यांना दागिने व कपड्यालत्त्याची बिलकुल आसक्ती नव्हती. संसाराची धुरा सांभाळत असताना सोयरे सकाळ, प्रिय जी.ए., समांतर जीवन, मण्यांची माळ, याशिवाय मनातलं अवकाश असे लेखन करून लेखक म्हणून स्वतःची वेगळी ओळख करून दिली. तसेच विविध वर्तमानपत्रे तसेच दिवाळी अंकांमधून त्यांनी लेखन केले व ते पुस्तकरूपाने प्रसिद्ध केले.
त्यांनी पुलंबरोबर अनेक नाटकांत काम केले. तसेच “वंदेमातरम्’ या राम गबाले दिग्दर्शित चित्रपटातील त्यांची भूमिका अतिशय गाजली होती. “नवरा बायको’ या चित्रपटातही त्यांनी काम केलेले आहे. “राजमाता जिजाबाई’ हा एकपात्री प्रयोगही त्यांनी रंगवला होता. पुलंच्या “सुंदर मी होणार’ मधील दीदीराजे ही मध्यवर्ती भूमिका सुनीताबाईंनी साकारली होती. 7 नोव्हेंबर 2009 रोजी पुणे येथे त्यांचे निधन झाले.