उंब्रज – लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पाल येथील खंडोबा देवाच्या यात्रेचे नियोजन योग्यरित्या करून भाविकांची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घ्या. तसेच दि. 20 ते दि. 26 जानेवारीपर्यंत सर्वांनी आपली जबाबदारी पार पाडावी, अशा सक्त सूचना सर्व शासकीय विभागाच्या अधिकार्यांना करून यात्रेत उधळण होणार्या भंडार्याची तपासणी करण्याच्या सूचनाही अन्न व औषध प्रशासनाला केली. तसेच यात्रेच्या अगोदर करण्यात येणारी सर्व कामे पूर्ण करावीत, असे निर्देश अप्पर जिल्हाधिकारी जीवन गलांडे यांनी दिले.
पाल, ता. कराड येथील खंडोबा-म्हाळसा देवाच्या यात्रेचा दि. 22 जानेवारी हा मुख्य दिवस आहे. त्या अनुषंगाने देवस्थान ट्रस्ट, ग्रामपंचायत प्रशासन, सर्व शासकीय विभाग व ग्रामस्थ यांच्यात झालेल्या तिसर्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे, तहसीलदार (परिक्षाधिन जिल्हाधिकारी) दोन्तुला जेनित चन्द्रा, पोलीस उप अधीक्षक अमोल ठाकूर, सहाय्यक गटविकास अधिकारी विजय विभुते, उंब्रजचे सपोनि प्रशांत बधे, कराड उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसन्ना पवार, देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष देवराज पाटील, सातारा जिल्हा भाजप उपाध्यक्ष सुरेश पाटील, ट्रस्टी संजय काळभोर, यात्रा कमिटी चेअरमन प्रशांत दळवी, सरपंच सुनिता घाडगे, उपसरपंच गणेश खंडाईत, ग्रा.पं. चयत सदस्य, शासकीय विभागाचे अधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
श्री. गलांडे यांनी सर्व शासकीय विभागाच्या अधिकार्यांकडून आत्तापर्यंत केलेली तयारी, तसेच राहिलेली कामे जाणून घेत प्रत्यक्ष स्थळी जाऊन पाहणी केली. यावेळी मंदिरासह परिसरात उभारण्यात येत असलेल्या दर्शन बारीची पाहणी करून पार्किंग व्यवस्था, पालखी मार्ग व पूलाच्या कामाचीही पाहणी केली. यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी नियोजनाच्या अनुषंगाने उपस्थित केलेल्या समस्या अपवाद वगळता अन्य समस्यांचा निपटारा झाला असल्याचे ग्रामस्थ, तसेच देवस्थान ट्रस्टकडून सांगण्यात आले.
देवराज पाटील यांनी पालखी मार्ग, पूलाचे काम युद्ध पातळीवर चांगल्या पद्धतीने सुरू आहे. पूलाच्या कामासाठी जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे अधिकारी, कर्मचारी व ठेकेदार यांचेअभिनंदन करून विविध विभाग यात्रा अनुषंगाने करत असलेल्या तयारीच्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले. त्याचबरोबर देवस्थानच्या जागेत भक्तनिवास, आरसीसी दुकान गाळे बांधण्यासाठी प्रयत्न करणार असून यासाठी लागणारा निधी शासनाकडून मिळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
याप्रसंगी करायचे काम आणि केलेल्या कामचा आढावा प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांनी घेऊन प्रगती पथावरील कामे जाणून घेतली. तर कामे का झाली नाहीत? याचे सबळ कारण जाणून घेत संबंधिताना सूचनाही केल्या. पाच पथक स्थापन करत असल्याचे सांगत ज्या विभागाचे आदेश होतील, त्याचे पालन करावे. वॉकीटॉकीचा वापर समन्वय साधण्यासाठी करून सर्व विभागांनी समन्वयाने काम केल्यास येणार्या भाविकांना चांगले दर्शन होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी सर्व विभागानी केलेल्या कामाचा लेखाजोखा मांडला. सुरेश पाटील यांनी आभार मानले.