मुंबई – राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे नावाप्रमाणे राज्याला उद्ध्वस्त करायला निघाले आहेत. जनतेचा प्रतिसाद पाहता, महाविकास आघाडीला कंटाळलेली आहे, अशा शब्दांत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राज्य सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली.
मुंबईतून जन आशीर्वाद यात्रेला नारायण राणे यांच्या उपस्थितीत सुरूवात झाली. यावेळी नारायण राणे म्हणाले की, मी प्रथमच एवढे दिवस दिल्लीत राहिलो. मी काम आणि विकास करू शकेल या विश्वासाने फडणवीस यांनी मला दिल्लीला पाठवले. फडणवीस यांनी ज्या उद्देशाने पाठवले त्या उद्देशाने मोदी यांना पाठबळ देणार आहे आणि देश आघाडीवर कसं जाईल यासाठी प्रयत्न करेल, असे राणे म्हणाले.
राणे म्हणाले की, गर्दी कमी करायच्या मी विरोधात आहे, फक्त नियम पाळा. दीड महिना मंत्री होऊन झाला, एक वेगळा अनुभव मिळाला. मंत्रिमंडळाच्या बैठकीत बसल्यावर आपण नवीन मंत्री झालो, असे वाटले नाही, असेही राणे म्हणाले.
हे राज्यातील जनतेचं पद आहे. जनतेची सेवा, विकास, रोजगार निर्माण करणार. जीडीपीमध्ये देश आघाडीवर असावा यासाठी प्रयत्न करणार. महाराष्ट्राचं नाव दिल्लीत केल्याशिवाय राहणार नाही, असेही ते म्हणाले.