पारगाव शिंगवे (वार्ताहर) – महिला शेतकऱ्याने साठवलेल्या बराकीतील कांद्यावर अज्ञात व्यक्तीने युरिया टाकून 200 पिशव्या कांद्याचे नुकसान केले आहे. या घटनेत वळती (ता. आंबेगाव) गावच्या गांजेवाडीतील शेतकरी महिलेचे 2 लाख रुपयांचे नुकसान झाले. ही घटना गुरुवारी (दि. 19) दुपारी 12 वाजता उघडकीस आली. याप्रकरणी मंचर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे.
मंदाकिनी दतु चेके असे तक्रार देणाऱ्या महिलेचे नाव आहे. याबाबतची माहिती अशी की, गांजेवाडी येथील शेतकरी मंदाकिनी दतु चेके यांनी मे महिन्यात शेतातील पिकवलेला 400 पिशवी कांदान बराकीत साठवून ठेवलेला होता.
महिन्यापूर्वी 150 पिशवी कांद्याची विक्री केली होती. तर बराकीत अंदाजे 200 पिशवी कांदा शिल्लक होता. गुरुवारी 12 वाजण्याच्या सुमारास मंदाकिनी चेके व मुलगा तुषार चेके हे बराकीतील कांदा पिशव्यामध्ये भरण्यासाठी आले असता बराकीतील कांद्याचा वास येवू लागला.
या बराकीतील कांद्यात अज्ञात व्यक्तीने रसायनिक युरिया टाकून साठवलेल्या कांद्याचे नुकसान झाल्याचे दिसून आले. तसेच यापूर्वी अज्ञात व्यक्तीने रात्रीच्या वेळी शेतातील कोथिंबीर यावर तणनाशक औषधाची फवारणी करून 3 लाख रुपयांचे नुकसान केले होते. तसेच रात्री अपरात्री वेळी घरावर दगडफेक करून दहशत निर्माण करण्यात येत आहे.