रेडा – दुबई येथे झालेल्या जागतिक साखर परिषदेत साखर उद्योगातील आव्हाने व संधी यावर सविस्तरपणे सकारात्मक अशी चर्चा करण्यात आली. या साखर परिषदेमध्ये राज्याचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील व ऑल इंडिया शुगर मिल असोसिएशन (इस्मा) दिल्लीच्या तसेच इंडियन शुगर एक्झिम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या संचालिका अंकिता हर्षवर्धन पाटील यांनी सहभाग घेतला.
अल खलीज शुगरचे व्यवस्थापकीय संचालक व प्रधान भागधारक जमाल अल घुराईर आणि एमेटर्राचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी जेकॉब रॉबिन्स यांनी या साखर परिषदेचे यशस्वीपणे आयोजन आयोजन केले होते. प्रत्येकी चार वर्षांनी या साखर परिषदेचे आयोजन केले जाते.
या साखर परिषदेत जगामध्ये साखरेची मागणी व उपलब्धता यांसह साखर उद्योगांसमोरील समस्या, संधी व आव्हाने, साखरेचे कमी-अधिक होणारे दर, विपणन आदी विषयांवरती चर्चा करण्यात आली. तसेच भारत देशातील साखर उद्योगापुढील असलेल्या प्रमुख आव्हानांसंदर्भात व त्यावरती कोणत्या उपाययोजना करता येतील, यासंदर्भातही ऊहापोह करण्यात आला.
तसेच जागतिक साखर उद्योगातील तज्ञांशी चर्चा केली. या चर्चेदरम्यान तज्ञ मान्यवरांनी साखर उद्योगासमोरील अडचणी संदर्भात अभ्यासपूर्ण मते व्यक्त केली, अशी माहिती हर्षवर्धन पाटील यांनी दिली.
साखर उद्योगातील सर्व प्रमुख मान्यवर व निर्यातदारांना एकत्र आणण्यासाठी या साखर परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. दुबई शुगर कॉन्फरन्स 2020 ने उपस्थितांना नवीन दृष्टीकोन, महत्त्वपूर्ण संधी आणि अमूल्य नेटवर्किंग व कनेक्शन प्रदान केले.
-अंकिता पाटील, संचालिका इस्मा