जाधववाडी, दि. 25 (वार्ताहर) -करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने शाळा सुरळीत सुरू झाल्या आहेत. त्यामुळे शाळांची मैदाने व वर्ग मुलांनी भरून गेली आहेत. परंतु काही मुले, मुली शाळेत जातो असे सांगून घरातून बाहेर पडतात मात्र ते शाळेत न पोहोचता कुठेतरी बाहेरच मित्रांबरोबर भटकत असल्याचे दिसून येत आहेत. त्यामुळे पालकांनी आणि शाळा व्यवस्थापनाने मुलांवर बारकारईने लक्ष ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे.
मागील दोन वर्षे करोना महामारीमुळे शाळा सुरू नव्हत्या. त्यामुळे शाळा व्यवस्थापन आणि पालकांना मुलांवर विशेष लक्ष देण्याची गरज वाटत नव्हती. कारण मुले सातत्याने डोळ्यांसमोर होती. परंतु सध्या शाळा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे सर्व मुले, मुली शाळांत जात आहेत. परंतु वयोमानानुसार विद्यार्थ्यांच्या विचारात बदल होत असतो. त्यानुसार कृती घडत असते. त्यामुळे विशेषतः दहावी ते बारावीचे विद्यार्थ्यांवर पालकांनी आणि शाळा प्रशासनाने विशेष लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. मराठी एक प्रसिद्ध गीत आहे, “सोळावं वारिस धोक्याचं’ त्याप्रमाणे आपल्या मुला-मुलीचं कुठे वाकडे पाऊल तर पडत नाही ना ही त्या मुलाची स्वतःची नैतिक जबाबदारी आहे तर मुलांच्या विशिष्ट वयात त्यांच्या हालचालीवर वागणुकीवर विशेष लक्ष ठेवणे पालकांची जबाबदारीच नव्हे तर पालकांचे कर्तव्यच आहे. त्यामुळे आपल्या मुलांचे जीवन सुधारण्यास मदत होणार आहे. जर त्यांना योग्य वेळेत योग्य मार्गदर्शन मिळाले नाही तर त्यांचे आयुष्य वेगळ्या वळणावर जाते. त्यामुळे पालकांनी आपल्या पाल्यावर विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.
पालकांनी काय करावे
शाळेत वर्गशिक्षकांची अधूनमधून भेट घेणे.
आपल्या पाल्याच्या अभ्यासातील प्रगतीबाबत चर्चा करणे.
शाळेला अचानकपणे भेट दिल्याने आपल्या पाल्याला आपले पालक कधीपण येऊ शकतात त्यामुळे आपण शाळा सोडून जाऊ नये याची जाणीव होते.
आपला पाल्य कोणाबरोबर राहतो. त्याचे मित्र कोण आहेत याची माहिती ठेवावी.
आम्ही आमच्या शाळेत सुरवातीपासून इयत्ता 9 व 10 वीच्या सर्व मुलांच्या पालकांचे व्हॉट्सऍप ग्रुप बनविले आहेत. त्यावर गैरहजर असणाऱ्या मुलांची नावे दररोज पाठविली जातात. विद्यार्थी गैरहजर असल्यास आम्हाला लेखी स्वरूपात कळवा अशा सूचना दिल्या जात आहेत. त्यामुळे विद्यार्थी शाळा सोडून जात नाही. – वर्षा लोखंडे, ज्ञानज्योती माध्यमिक विद्यालय, जाधववाडी.
शाळेच्या वेळेत बाहेर फिरायला जाण्याची क्रेज
बहुतांशी शाळांतील मुले चित्रपट आणि मोठ्या कॉलेजमधील मुला-मुलींचे अनुकरण करत आहेत. आपल्या मित्र आणि मैत्रीणींबरोबर ते शाळेच्या वेळेत गार्डन, उद्यान तसेच इतर पर्यटनाच्या ठिकाणी फिरण्यास जाण्याचे सध्या क्रेज दिसून येत आहे. पालक आपली मुले शाळेत गेल्याने बिनधास्त असतात. परंतु बहुतांश वेळा मुले, मुली शाळेत न जाता बाहेर चकाट्या मारत असतात. त्यामुळे त्यांच्यावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे.
शाळांनी पालकांचे बनविले व्हॉट्सऍप ग्रुप
पिंपरी चिंचवड शहरातील बहुतांश शाळांनी पालकांचे व्हॉट्सऍप ग्रुप बनविले आहेत. जी मुले शाळेत येत नाहीत अथवा गैरहजर आहेत अशा मुलांच्या पालकांना शाळेकडून मुलगा अथवा मुलगी गैरहजर असल्याचा संदेश पाठविला जातो. तसेच ते का गैरहजर आहेत याचे कारण विचारले जाते. त्यातून पालकांना आपला मुलगा, मुलगी शाळेत आहे की नाही याची माहिती मिळत आहे. त्यामुळे मुलांचे शाळेच्या वेळेत बाहेर फिरण्यावर आळा बसला आहे. असे असले तरी शाळा आणि पालकांनी मुलांवर विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.