हर्षद कटारिया
बिबवेवाडी – शहरातील उड्डाणपुलाखालील जागेचा वापर करण्यास नियमांतर्गत मनाई असताना अशा जागांचा वापर विविध (अवैध) कारणांसाठीच अधिक प्रमाणात होत असल्याचे निदर्शनास येत असताना “जी-20’च्या निमित्ताने अशा ठिकाणांची स्वच्छता करण्यात येईल, अशी नागरिकांची अपेक्षा असताना पुलावर रंगरंगोटी आणि पुलाखाली घाण, कचरा, राडारोडा अशी स्थिती स्वारगेट तसेच सातारा रस्त्यावरील शंकर महाराज उड्डाणपूलाखाली आहे.
यासह शहर, उपगरांतील अन्य पुलाखालीही असेच चित्र असल्याने विदेश पाहुणे येत असताना उड्डाणपुलाखालील जागा स्वच्छ करणार की झाकणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. शहरात “जी-20′ परिषदेचे दुसरे सत्र होत असल्याने पाहुण्यांच्या स्वागताची तयारी वेगात सुरू आहे. यासाठी शहर तसेच उपनगरांतील काही रस्त्यांवर रोषणाई, रंगरंगोटी तसेच उड्डाणपुलावरही सुशोभिकरणाचे काम केले जात आहे.
यासाठी महापालिकेकडून कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला जात आहे. परंतु, अशा वेळी उड्डाणपुलांखालील राडारोडा, कचरा-घाण, भंगार आदींची सफाई करणेही गरजेचे असताना केवळ उड्डापुलावरच सुशोभिकरण केले जात आहे. सातारा रस्त्यावरील लक्ष्मीनारायण सिनेमागृह समोरील उड्डाणपुलाखाली तर ओपन बार सुरू असतो, परिसरातील मद्यपीसाठी ही हक्काचे जागा झाली आहे. याच ठिकाणी अनधिकृतपणे खाद्यपदार्थ विकणाऱ्यांचाही मोठा “बाजार’ भरत असल्याने सर्वत्र घाण साचते आहे.
शहर, उपनगरांतील बहुतांशी उड्डाणपुलांखालील स्थिती अशीच विदारक असून प्रचंड अस्वच्छता, अनेकांनी केलेले अतिक्रमण यातून विद्रूपीकरणात भरच पडत आहे. “जी-20’च्या पार्श्वभूमीवर अशा उड्डाणपुलाखालील अतिक्रमण हटविणे तसेच स्वच्छता करणे करजेचे आहे. अन्यथा पुलावर केलेल्या रंगरंगोटी, सुशोभीकरणाला काहीच अर्थ राहत नाही. परंतु, महापालिका प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष आहे.
…म्हणून पुलाखाली अस्वच्छता
मुंबई महापालिकेने उड्डाणपुलाखालील जागेत पार्किंग केल्याने याविरोधात काही जणांनी उच्च न्यायालयात फेरयाचिका दाखल केली आहे. याचा निर्णय अद्याप झालेला नसल्याने पुणे महापालिकेनेही उड्डाणपुलांच्या खालील जागेच्या वापराचे धोरण निश्चित केलेले नाही. पालिकेचे धोरण निश्चित नसले तरी पुलाखालील भाग स्वच्छ ठेवण्याची तसेच अतिक्रमण रोखण्याची जबाबदारी त्या-त्या ठिकाणच्या क्षेत्रीय कार्यालयांची असताना अशा कामांकडे दुर्लक्ष केले जात असल्याने पुलाखालील जागांची मोठी दुरवस्था झाल्याचे पहायला मिळते, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जयराज लांडगे यांनी सांगितले.
शहरामध्ये “जी-20’च्या निमित्ताने सुशोभिकरण तसेच स्वच्छतेची कामे सुरू आहेत. अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करून उड्डाणपुलाखालील जागाही स्वच्छ करण्यात येतील, तसा आदेश संबंधीत यंत्रणेला दिला जाईल, असे मनपाचे अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार म्हणाले.