भोर (पुणे) – भोर तालुक्यातील दुर्गम डोंगरी भागातील हिर्डोशी ग्रामपंचायतीअंर्तगत असलेल्या धामणदेव येथील 13 गायी आणि 6 बैल मागील एक ते दीड महिन्यात बोटुलिझम या आजाराने दगावली असल्याने शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी जनावरांचा विमा उतरवला असला तरी विमा कंपनीने हात वर केले असल्याने शेतकरी वाऱ्यावर आला असून, नुकसान भरपाई देण्याची मागणी करत आहेत.
या भागात मागील 20 वर्षांपासून हा आजार सुरू आहे. मात्र, पशुसंर्वधन विभागाकडूद कोणतीही उपाययोजना होत नसल्यामुळे पशूपालकांना या संकटाशी सामना करावा लागत आहे. भोर-महाड रस्त्यावरील धामणदेव आणि हिर्डोशी गाव असून, येथील शेतकरी किंमती जनावरे पाळून दुग्ध व्यवसाय करीत आहेत. गेल्या एक-दीड महिन्यापासून जनावरे अशक्त होऊन पुढच्या पायांची हालचाल होत नाही, तर .मागचे पाय लुळे पडून जनावरे जागेवरच बसत आहेत. त्यांचे चारा-पाणी खाणे बंद होत असून, साधारणपणे आठ ते दहा तासाने जनावरांच्या तोंडाला लाळे सारखे पाणी सुटून 2 ते 3 तासांनी जनावरे मरण पावत आहेत. हा बोटुलिझम नावाचा आजार होऊन या भागातील आत्तापर्यंत 6 बैल आणी 13 गाई मरण पावल्या आहेत, यामुळे 13 शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.
भोर तालुका पशुधन विभागाने याची दखल घेऊन जनावरांनाची तपासणी करुन जनावरांना कॅल्शियमच्या बाटल्यांचे वाटप करण्यात आले असून, इतर औषधोपचारही सुरू केले आहेत. मात्र जनावरे मरण्याचे प्रमाण कमी होत नसून त्यात वाढच होत आहे. गेल्या 20 वर्षांपासून हा आजार जनावरांना होत आहे. याबाबत भोर तालुका पशुसंर्वधन विभागाला सांगूनही त्यावर काहीच उपाययोजना होत नसल्याने जनावरे दरवर्षी पावसाळ्यात मरत आहेत. विमा कंपनी विमा काढते; पण विम्याचे पैसे कंपनीकडुन मिळत नाहीत.
– पांडुरंग गोरे, माजी सरपंच, हिर्डोशी, ता. भोर