नवी दिल्ली – गेल्या अधिवेशनातील गोंधळाचे कारण दाखवून या अधिवेशन काळासाठी राज्यसभेच्या विरोधी पक्षांच्या बारा खासदारांवर काल निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईचा निषेध करीत कॉंग्रेस सह सर्व विरोधी सदस्यांनी आज राज्यसभेच्या कामकाजावर बहिष्कार टाकला.
या संबंधात बोलताना विरोधी पक्ष नेते मल्लिकार्जून खरगे म्हणाले की, या खासदारांना निलंबीत करण्याचा सरकारकडून आणण्यात आलेला प्रस्ताव हा पुर्णपणे कामकाज नियमालवलीचा भंग आहे. या प्रकरणात अध्यक्षांना पॉइॅन्ट ऑफ ऑर्डरही उपस्थित करू दिली गेली नाही.हे निलंबन तातडीने मागे घ्यावे अशी मागणीही त्यांनी अध्यक्षांकडे केली. यावर अध्यक्ष म्हणाले की ही कारवाई अध्यक्षांनी नाही तर सभागृहाने केली आहे.
निलंबीत सदस्यांनी आपल्या वर्तणुकीविषयी जराही खेद व्यक्त केला नाही उलट त्यांनी आपल्या गैरवर्तणुकीचे समर्थनच केलेले आढळले असेही अध्यक्ष व्यंकैय्या नायडू यांनी नमूद केले. अध्यक्षांच्या या निर्णयाच्या विरोधात कॉंग्रेस, आप, राजद आणि डाव्या पक्षांनी घोषणाबाजी करीत निषेध केला. पण त्यांच्या या घोषणाबाजीलाही नायडू यांनी मनाई केल्यानंतर या पक्षाच्या सदस्यांनी कामकाजावर बहिष्कार घातला.
तृणमुलच्या सदस्यांनीही बहिष्कार घातला पण ते थोड्याचवेळात सभागृहात परतले. यावेळी बोलतान तृणमुलचे सदस्य डेरेक ओब्रियन म्हणाले की, विरोधी पक्षांच्या 12 सदस्यांना नव्हे तर सत्ताधारी पक्षाच्याच 80 सदस्यांना सभागृहातून निलंबीत करायला हवे होते. काल निलंबीत करण्यात आलेल्या बारा सदस्यांमध्ये कॉंग्रेसचे सहा, तृणमुल कॉंग्रेस व शिवसेनेचे प्रत्येकी दोन आणि दोन्ही कम्युनिस्ट पक्षाच्या प्रत्येकी एका सदस्याचा समावेश आहे.