शरद रसाळ
पारनेर -चालू वर्षी जून ते डिसेंबरदरम्यान पावसाने झोडपले. या दरम्यान ओढे-नाले तुडूंब भरून वाहू लागले. मोठ्या प्रमाणात जमीन पाण्याखाली गेली. या दरम्यान शेतकऱ्यांच्या दृष्टीने मुख्य पीक असलेल्या ज्वारीची पेरणी होऊ शकली नाही. जमिनीतील ओलावा संपल्यानंतर तालुक्यात मोठ्या प्रमाणात कांदा पिकाची लागवड करण्यात आली. विजेचे संकट असताना रात्रीचा दिवस करून शेतकऱ्यांनी कांदा पीक जगवले. मात्र, चालू वर्षी कांद्याला 2 ते 7 रुपये बाजारभाव मिळत असल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले.
एक एकर कांदा लागवडीसाठी आठ ते दहा हजार रुपये खर्च येतो.
त्यानंतर कांदा खुरपणी, रोगराई झाल्यानंतर महागड्या औषधांची फवारणी, खत, दिवसा वीज मिळत नसल्याने रात्री-अपरात्री पाणी देणे आदी समस्या पार करत कांदा पिकाची तळहाताच्या फोडाप्रमाणे निगा राखली जाते. मात्र, कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांची आर्थिक घडी विस्कटलेली दिसून येत आहे.
कांदा पिकाचे मुख्य आगार असलेल्या पारनेर तालुक्यात टाकळी ढोकेश्वर, पोखरी, जवळे, निघोज, पानोली, राळेगणसिद्धी, वाडेगव्हाण, नारायणगव्हाण, जातेगाव, पाडळी रांजणगाव, कडूस, भोयरे गांगर्डा, बाबुर्डी, रुईछत्रपती, आपधूप, रांजणगाव मशीद, पिंपरी गवळी, रायतळे, अस्तगाव, वाळवणे, हंगे, मुंगशी, म्हसणे सुलतान, वाघुंडे, सुपे आदी भागात मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादन घेतले जाते. चालू वर्षी या भागात कांद्याची विक्रमी लागवड करण्यात आली. कांदा लागवडीपासून ते काढणी काटणीसाठी गेलेला खर्चही निघत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
सरकारने कांदा पिकाची निर्यात करून कांद्याला 30 रुपये हमी भाव द्यावा, अशी मागणी होत आहे. यंदा जोरदार पाऊस होऊनही पिकांना भाव मिळत नसल्याने बळीराजा हतबल झाला आहे. कांदा, कोबी, वांगे, टमाटे यांना मिळणारा कवडीमोल भाव पाहता शेतकऱ्यांतून सरकारविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. शेतकरी नागवला जात आहे.
शेती करणे झाले जिकिरीचे
कृषी प्रधान देशात शेतकऱ्यांनी पिकविलेल्या मालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी देशोधडीला लागले आहेत. बळीराजाने पिकविलेल्या कांदा, ज्वारी, बाजरी, मुग, हरबरा, सोयाबीन, गहू, मका आदी पिकांना कष्टाच्या मोबदल्यात बाजारभाव मिळत नसल्याने शेती व्यवसाय करणे मोठे जिकिरीचे झाले आहे. यातुनच कुटुंब चालवणे, मुलांचे शिक्षण, मुलीचे लग्न हा खर्च पेलवताना यातून शेतकरी कर्ज बाजारी होत चालला आहे.
शेतकऱ्यांनी पिकविलेला कांदा कवडीमोल भावाने विकावा लागत आहे. यातून खर्चही भागत नसल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे.सरकारने यावर योग्य तो निर्णय घ्यावा; अन्यथा सरकारला याची किंमत मोजावी लागेल.
प्रकाश पवार, प्रगतिशील शेतकरी, सुपा