अफवांमुळे चिकनला उठावच नाही : ग्राहकांनी फिरवली पाठ
पेठ – सातगाव पठार (ता. आंबेगाव) भागात पोल्ट्री व्यवसाय करोनामुळे अडचणीत आले असून बुधवारी (दि. 18) पेठ गावात पोल्ट्री व्यावसायिकांनी 100 रुपयाला दोन कोंबड्या विक्रीला आणल्या होत्या.
करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर चिकन सेवनाने या आजाराचा फैलाव होतो, अशी अफवा समाज माध्यमाद्वारे पसरली आणि पोल्ट्री व्यवसायावर त्यांचा मोठा परिणाम झाला आहे. जिल्ह्यातील अनेक पोल्ट्री व्यावसायकांना याचा फटका बसला आहे. बाजारात चिकनला उठाव नसल्याने पेठ गावातील मुख्य बाजारपेठेतील रस्त्यावर अनेक पोल्ट्री व्यावसायिकांनी कोंबड्या थेट विक्रीस आणल्या होत्या आणि त्याचा भाव शंभर रुपयांना दोन कोंबड्या असा होता.
मात्र, असे असूनही कोंबड्या खरेदीकडे ग्राहकांनी पाठच फिरवली असल्याचे दिसून आले. पेठमधील बाजारपेठेत पोल्ट्री व्यावसायिक मारुती मोरडे, हेमंत शिंदे, सुनील धुमाळ, नरेंद्र पवळे, संतोष धुमाळ आदी पोल्ट्री व्यावसायिक थेट गावात येऊन खुल्या दराने कोंबड्यांची विक्री करत होते.
पाच वर्षांपूर्वी सातगाव पठार हे पोल्ट्री व्यावसायिकांचे आगर होते; पण त्यावेळी बर्ड फ्ल्यूने धुमाकूळ घातला आणि येथील पोल्ट्री व्यवसायास घरघर लागली. आता मात्र करोना व्हायरसमुळे पोल्ट्री व्यावसायिक आर्थिकदृष्ट्या अडचणीत आले आहेत, त्यामुळे सरकारने या भागातील पोल्ट्री व्यावसायिकांना शासकीय मदत मिळणे गरजेचे आहे, अशी मागणी येथील पोल्ट्री व्यावसायिकांनी केली आहे.