वयाची 65 ओलांडल्यानंतर आरामाचे वय सुरू होते. परंतु अमिताभ बच्चन, डॅनी यांसारखे जुन्या जमान्यातील अनेक दिग्गज कलाकार आजच्या तरुण पिढीलाही लाजवेल, असे काम करत आहेत. प्रेम चोप्रा असो, रणजित असो या मंडळींनी स्वत:च्या तब्येतीची अतिशय चांगल्या रितीने काळजी घेतल्याने आजही त्यांचा सहज वावर दिसून येतो. माला सिन्हा, वहिदा रहमान, आशा पारेख यांसारख्या नायिकांनीही सेकंड इनिंगमध्ये शांततापूर्ण आयुष्याला प्राधान्य दिल्याचे दिसते. सिनेसृष्टीतील काही कलाकारांच्या या सेकंड इनिंगचा आढावा…
वहिदा रेहमान, आशा पारेख, वैजयंती माला, शत्रुघ्न सिन्हा, मालासिन्हा, हेलन सारखी असंख्य मंडळी सध्या आराम करत आहेत. तसे म्हटलं तर वयाची 65 ओलांडल्यानंतर आरामाचे वय सुरू होते. परंतु बहुतांश तारकांनी स्वत:ला शिस्त लावून घेतली आहे. जुन्या जमान्यातील दिग्गज कलाकार अमिताभ बच्चन, डॅनी हे तर आजच्या तरुण पिढीलाही लाजवेल, असे काम करत आहेत. त्यांच्याबाबत काहीच सांगण्याची गरज नाही. कोणत्याही जुन्या कलाकाराचे नाव घ्या, प्रत्येक जण आपल्या जीवनशैलीप्रमाणे जगत आहे. प्रेम चोप्रा असो, रणजित असो या मंडळींनी स्वत:च्या तब्येतीची अतिशय चांगल्या रितीने काळजी घेतल्याने आजही त्यांचा सहज वावर दिसून येतो. बॉलीवूडचे महानायक दिलीपकुमार यांनी नुकताच 96 वा वाढदिवस साजरा केला. त्याचबरोबर प्राण यांनीही वयाची नव्वदी पार केली होती. साडेतीनशेहून अधिक चित्रपटात काम करणारे प्राण हे अतिशय शांत स्वभावाचे होते. प्राणप्रमाणेच ए.के. हंगल, अभिनेत्री नंदा, दारासिंग, साधना आदी कलाकारांनी हयात असताना शांततामय जीवनाचा वस्तूपाठ घालून दिला होता.
अभिनय सम्राटचे गुपित
96 वर्षाचे अभिनयसम्राट दिलीप कुमार यानी तीन चार वर्षापूर्वी स्वत:ला तंदुरुस्त ठेवले होते. परंतु ते आता कोणालाच भेटत नाहीत. पाली हिल येथे दिलीपकुमार यांचे वास्तव्य असून परिसरात राहणारे नागरिक त्यांची ख्यालखुशाली विचारतात. विशेषत: लहान मुलांत दिलीपकुमार यांच्याबाबत खूपच उत्सुकता आहे. युसूफ अंकल म्हणून त्यांना हाक मारली जाते. काही मुलं त्यांना भेटायलाही जातात. वाढत्या वयाने त्यांना बोलताना दम लागतो. मात्र ते भरभरुन आयुष्य जगले आहेत. त्यांची पत्नी अभिनेत्री सायराबानो म्हणते की, आता ते अगदी लहान मुलांप्रमाणे हट्ट धरतात. डॉक्टरांचे म्हणणे ते ऐकत नाहीत. आजही त्यांना बिर्याणी खावीशी वाटते. कधी कधी मुलांना पार्टीला बोलवायला आवडते. शाहरुख खान हा नेहमीच भेटायला येतो. फुटबॉलचा शौक अजूनही कायम आहे. काहीवेळा ते फुटबॉल मॅचचे “हायलाइटस’ देखील पाहतात.
माला सिन्हा आणि आशा पारेख सक्रिय
वयाच्या 82 व्या वर्षीही मालासिन्हा सध्या आराम करत आहे. बांद्रा पश्चिमच्या टर्नर रोड येथील भव्य बंगल्यात अनेक वर्षांपासून एकटीच राहत आहे. या एकाकी राहणाऱ्या अभिनेत्रीने कधीही एकटेपणा येऊ दिला नाही. एकुलती एक कन्या प्रतिभा सिन्हा ही बॉलिवूडवर फार छाप पाडू शकली नाही. तिने विवाह केला आणि संसारात रमली. अधूनमधून ती भेटायला येते. मालासिन्हाला सुरवातीपासूनच कुत्रे पाळण्याची हौस होती आणि आजही आहे. एवढेच नाही तर रस्त्यावरचे कुत्रे देखील तिला चांगल्या रितीने ओळखतात. माध्यमांसमोर माला सिन्हा फारसे येत नाहीत. मात्र त्या आपल्या रितीने सामाजिक कार्य करत आहेत. शांतपणे गरीबांना मदत करणे, हे त्यांचे आवडीचे काम. जो अडचणींमुळे मदत घेतो, त्याला मदत कोणी केली, याचा थांगपत्ता लागू नये, असे मालासिन्हांचे मत आहे. यामुळे मदत करणाऱ्याला आणि मदत घेणाऱ्याच्या मनाला शांती लाभते. अशीच स्थिती आशा पारेख यांचीही आहे. काही वर्षापूर्वी त्यांना लाइफ टाइम अचिव्हमेंट पुरस्काराने गौरविले होते. सांताक्रुझ पश्चिम येथे त्यांच्या नावाने रुग्णालय आहे. त्याची देखभाल करण्यातच आशा पारेख यांचा वेळ जातो. अन्य अभिनेत्रींच्या तुलनेत त्या अधिकच व्यग्र राहतात. काही वेळा त्या आजीच्या भूमिकेत दिसतात. एकेकाळी त्यांची टिव्ही कंपनी होती. त्या माध्यमातून त्या सतत काहीतरी नियोजन करत असायच्या. बहुचर्चित मालिका “कोरा कागज’ला अजूनही प्रेक्षक विसरले नाहीत. 77 वर्षाच्या आशा पारेख यांचे हास्य अजूनही श्रोत्यांना भुरळ पडते. त्या म्हणतात, मी लग्न करुन संसार थाटला नाही. मी समाजालाच कुटुंब मानले आहे. या विचारावरच आजपर्यंत आणि पुढेही असेच माझे आयुष्य राहिल.
वेळ घालवण्याची कला
हास्य अभिनेता जगदिप यांनी वयाची 80 गाठली आहे. आपले वय ते आपल्या शैलीत सांगतात. ते म्हणतात, वयाचे काय घेऊन बसलात, जोपर्यंत स्वत:ला नौजवान समजाल तोपर्यंत आपण उत्साही राहाल. नाही तर काही वर्षापासून आरामच सुरू आहे. जगदीप सध्या मुलांसमवेत राहणे पसंत करतात. त्यांचा मुलगा जावेद जाफरीने टीव्ही आणि चित्रपटात चांगले नाव कमावले आहे.
भारतकुमार कवितेत हरवले
82 वर्षाचे ज्येष्ठ अभिनेते मनोजकुमार सध्या आजारी आहेत. काही वर्षापासून त्यांनी दोन चित्रपट फ्लोरवर आणण्याचा प्रयत्न केला, मात्र पुढे जावू शकले नाही. यासंदर्भात दोन्ही मुले कुणाल आणि विशाल हे दोघेही निष्क्रिय राहिले. कधीकाळी चित्रपट निर्मिती करण्याबरोबरच होमिओपॅथी उपचार करण्याची आवड होती. मनोजकुमार यांचे कविता प्रेम सर्वांनाच ठाऊक आहे. त्यांनी आतापर्यंत काव्यसंग्रह प्रकाशितकेला नाही. सध्या त्यांची तब्येत नरमच राहते. तरीही त्यांनी आपल्या रुटीन लाइफवर परिणाम होऊ दिला नाही.
धर्मेद्र मस्त, हेमा व्यग्र
बॉलीवूडचे मोस्ट हॅंडसम नायक धर्मेंद्र आता वय लपवू शकत नाहीत. त्यांचा बहुतांश वेळ घरातच जातो. पार्टी आणि अन्य कार्यक्रमापासून ते दूरच राहतात. शायरी आणि कविता लेखनवरुन ते सुरवातीपासूनच गंभीर राहिले आहेत. ते उर्दुत लिहतात. फावल्या वेळात शायरी लिखाण हा त्यांचा आवडता छंद. त्यामुळे त्यांची पत्नी हेमामालिनी आता शायरीवर पुस्तक काढण्याचा आग्रह करत आहे. दुसरीकडे हेमामालिनी राजकारणात सक्रिय नेत्या आहेत.
वहिदा रेहमान
गाइड, मुझे जिने दो, नीलकमल, प्रेम पुजारी, तिसरी कसम, खामोशी, रेशमा और शेरा, धरती आदी डझनभर चित्रपटातील त्यांचा अभिनय हा संस्मरणीय ठरला आहे. 1991 चा लम्हें प्रदर्शित झाल्यानंतर त्यांनी चित्रपटापासून दूर राहणे पसंत केले. यादरम्यान दीर्घआजारानंतर त्यांचे पती कंवलजित यांचे निधन झाले. त्यांचे दोन्ही मुले मोठी झाली आहेत. काही काळ त्यांनी बंगळूरमध्ये वास्तव्य केले आणि त्या आता पुन्हा मुंबईला आल्या. त्या म्हणतात की, मुंबईहून माझी सतत आठवण काढली जात असे. त्यामुळे पुन्हा मी मुंबईला आले. साहजिकच अभिनयाची सेकंड इंनिगही सुरू झाली आहे. त्यामुळे वयाचा विचार खूपच मागे पडला आहे. आताचा अभिनय म्हणजे एखाद्या चॅरिटी सामन्याप्रमाणेच आहे. अधून मधून त्या चित्रपटात दिसतात. त्यांचे चाहते त्यामुळेच आनंदी आहेत.
बिझी वैजयंतीमाला
ज्येष्ठ अभिनेत्री वैजयंतीमाला या आपल्या नृत्यकलेवरून बऱ्याच प्रमाणात बिझी राहतात. त्यांनी कधीही वयाकडे लक्ष दिले नाही. सध्या त्यांची तब्येत फार चांगली नाही. त्या म्हणतात, मी वय विसरुन गेले आहे. नृत्य क्षेत्रात मला आणखी खूप काम करायचे आहे. काही वर्षापूर्वी त्यांची आत्मकथा “बोडिंग…ए मेमोयर’ची बरीच चर्चा झाली होती. त्यात राजकपूर, दिलीपकुमार, देवआनंदसारख्या काही नायकांबाबत रंजक खुलासे केले होते. विशेषत: राजकपूरबाबत त्यांनी मांडलेल्या मतावरुन मुलगा ऋषीकपूर यांनी तीव्र आक्षेप घेतला होता. एकदा नृत्यकार्यक्रमाच्या निमित्ताने वैजयंतीमाला मुंबईला आल्या होत्या. मात्र त्यांनी आत्मकथेत उल्लेख केलेल्या गोष्टींचा कधीही उहापोह केला नाही. त्या म्हणतात, त्या काळात मला “धर्म मा’ चा खूप आधार मिळाला होता. जेव्हा एखादा हिरो माझ्याकडून अधिक स्वातंत्र्य मिळवण्याचा प्रयत्न करायचा तेव्हा ती माझ्यासमोर येऊन उभी राहयची. त्यांनी आत्मकथेत म्हटले की, जेव्हा राजकपूर यांचा चित्रपट रिलीज व्हायचा तेव्हा त्यांच्या चित्रपटाच्या नायिकेबरोबर प्रेमकथेच्या वावड्या उठायच्या. वैजयंतीमाला म्हणतात, मला त्या काळाबद्धल विचारु नका. जेव्हा मी माझ्या पुस्तकात त्यांच्या पात्रतेबद्धल लिहले तेव्हा त्याकडे कोणाचेच लक्ष गेले नाही. तूर्त सध्या या वयातही नृत्यकलेसाठी त्यांना सतत काहीतरी करावेसे वाटते. तनूजा यांनी अभिनयाचा मोह सोडला नाही. आपली नात निसा आणि युग यांच्याबरोबर त्या बराच वेळ घालवतात. त्यानंतरचा वेळ एखाद्या स्वयंसेवी संस्थेबरोबर व्यतित करतात.
सोनम परब