पुणे – प्रत्येक खेळात हार-जीत ही होतच असते. खेळाडूंनी मैदानावर तसेच आयुष्य जगतानादेखील खिलाडूवृत्ती जपायला हवी. ही खिलाडूवृत्ती आयुष्य जगताना खूप उपयोगी ठरते, असा सल्ला माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी खेळाडूंना दिला.
आमदार सुनील कांबळे आणि महारुद्र सामाजिक संघटना यांच्या वतीने तसेच महाराष्ट्र कबड्डी संघटनेच्या मान्यतेने भवानी पेठेतील जनरल अरुणकुमार वैद्य स्टेडियममध्ये आमदार चषक महाराष्ट्र राज्य खुली कबड्डी स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेला भेट दिल्यानंतर फडणवीस यांनी खेळाडू आणि उपस्थितांशी संवाद साधला.
टीमवर्क शिकण्यासाठी हा खेळ आदर्श आहे. अतिशय भव्य स्वरूपात या स्पर्धेचे आयोजन केल्याबद्दल कांबळे यांचे विशेष कौतुक करायला हवे. भविष्यातही ते अशा प्रकारच्या आणखी स्पर्धा घेतील, असा विश्वास आहे, असे फडणवीस यांनी नमूद केले.