नागपूर- “गद्दार फोडून सरकार स्थापन केले. देशभरात लोकशाही म्हणजे दहीहंडी आहे का? दिसली की फोडा असे प्रकार सध्या चालू आहेत. असे असले तरी आपण एकीची वज्रमूठ आवळली आहे, त्यामुळे आता जिंकेपर्यंत थांबायचे नाही,’ असा निर्धार माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला. भाजपाच्या बालेकिल्ल्यात पार पडलेल्या या दुसऱ्या वज्रमूठ सभेद्वारे महाविकास आघाडीने भव्य शक्तीप्रदर्शन केले. त्यांनी यावेळी पुन्हा एकदा राज्य आणि केंद्र सरकारवर निशाणा साधला.
ठाकरे पुढे म्हणाले, “अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आला, धर्माधिकारी यांचा गौरव झाला याचा आनंद आणि अभिमानाची गोष्ट आहे. पुरस्कार कुणाच्या हस्ते दिला? सच्चा माणसासमोर झुकावे लागते, हे महाराष्ट्राने पुन्हा एकदा दाखवून दिले. धर्माधिकारी व्यसनमुक्तीसाठी काम करतात, पण सत्तेची नशा देश उद्धवस्त करते.’
“आपल्या देशात लोकशाहीचा उपयोग सत्ताधाऱ्यांच्या मित्रांना मोठे करण्यासाठी होतो. यांचे मित्र श्रीमंतांच्या यादीत वर जात आहेत, पण गरीब मात्र खाली जातोय,’ असा आरोपही उद्धव ठाकरे यांनी अदानी प्रकरणावरून सरकारवर केला.
उलट्या पायाचे सरकार आले आणि सतत गारपीट होत आहे. हे सरकार अवकाळी आहे. अयोध्येला मीसुद्धा गेलो होतो. ती वेळ वेगळी होती. राम मंदिराचा मुद्दा कोर्टात होता. आधी मंदिर मग सरकार, आम्ही मोदींना सांगितले. मोदी म्हणाले आता नको. आता हे टिकोजी राव फणा काढतोय. हे रामभक्त असते तर सुरतला नाही तर अयोध्येला गेले असते. आताचे उपमुख्यमंत्री आधी कधी अयोध्येला गेले नाहीत. माझाच शर्ट अधिक भगवा दाखवण्यासाठी गेले,’ अशी टोलाही उद्धव ठाकरेंनी फडणवीस यांना लगावला.
पहिल्या पाचमध्ये आलो
“शेतकरी ओरडत आहेत, पंचनामे नका करू आमच्या मैताला या, हे तिकडेही जातील. नुसते वणवण फिरल्याने काम होत नाही. मी घरात बसलो म्हणून अनेक जण टीका करत होते, पण मुख्यमंत्री म्हणून मी पहिल्या पाचमध्ये आलो,’ असे उद्धव ठाकरे यांनी यावेळी बोलताना म्हटले.
मुख्यमंत्र्यांचा कॉमेडी शो सुरु- पटोले
मुख्यमंत्र्यांकडून राज्यात कॉमेडी शो सुरु असल्याचा बोचरा वार कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. पटोले पुढे म्हणाले, “संभाजीनगरमधील दोन गटांच्या वादात पोलिसांकडून मुद्दाम दुर्लक्ष करण्यात आले. “मविआ’ची भीती वाटत असल्यानेच नागपुरातील सभेच्या जागेचा वाद निर्माण करण्यात आला. नागपूरकरांना सध्या लुटलं जात आहे, त्यामुळे येथील परिस्थिती भयावह आहे.पुलवामा हल्ल्यातील स्फोटकेही नागपूरमधून गेली, त्याच्या सीबीआय चौकशीचे काय झाले?, अशी विचारणाही त्यांनी केली.
100 कोटींचा आरोप खोटा : देशमुख
संभाजीनगरची विराट सभा पाहून पायाखालची वाळू सरकल्याने नागपुरातील सभेला विरोध झाल्याचा आरोप आ. अनिल देशमुख यांनी केला. राज्यात अवकाळी होऊन पिकांचे मोठे नुकसान झाले तरी शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाही. सरकारच्या पॉलिसीमुळे राज्यात उद्योगधंदे येत नाहीत. माझ्यावरील 100 कोटींचा आरोपही खोटा होता, याबाबत कुठलाही पुरावा नाही. 14 महिने जेलचा भत्ता खाऊन बाहेर आलो असल्याने आता कुणालाही घाबरणार नाही, असेही देशमुख यांनी यावेळी म्हटले.