पुणे – अत्यल्प पाऊस…मागील वर्षी पावसाने झालेले नुकसान यामुळे सर्वच प्रकारच्या डाळींचे भाव कडाडले आहेत. यामध्ये, सर्वाधिक दरवाढ तुरडाळींची झाली आहे. घाऊक बाजारात एक किलो तुरडाळीचे भाव 150 ते 165 रुपयांवर गेले आहेत. किरकोळ बाजारात एक किलो डाळीची तब्बल 170 ते 180 रुपये किलो दराने विक्री सुरू आहे. यामुळे स्वयंपाक घरात पुढील काही दिवस तरी डाळ काही शिजणार नाही.
व्यापारी नितीन नहार म्हणाले की, गतवर्षी मराठवाडा, कर्नाटक व विदर्भात तुरीच्या पेरण्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली. पेरणी 30 ते 40 टक्क्यांनी कमी राहिली. यादरम्यान, अतिप्रमाणात पाऊस झाल्याने त्याचा फटका पिकांना मोठ्या प्रमाणात बसला. परिणामी, तुरीच्या उत्पादनात घट झाली. देशात तुरडाळीची आयात केली जाणाऱ्या म्यानमार या देशातही हिच परिस्थिती दिसत होती. याठिकाणीही, कच्च्या मालाचे भाव जास्त होते. याकाळात, सरकारने तुरीचा हमीभाव वाढविला होता.
चालू वर्षी पावसाने ओढ दिल्याने खरीपाच्या पेरण्या 50 टक्क्यांपेक्षाही कमी झाल्या आहेत. सध्यस्थिती नामांकित कंपन्यांकडे डाळीचा मोठा पुरवठा आहे. डाळींचे वाढते भाव व अपुऱ्या पुरवठ्यामुळे त्यांनी विक्री थांबविली आहे. हेही तुरडाळींच्या दरवाढीचे प्रमुख कारण आहे. डाळींच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता नहार यांनी वर्तविली. मूग डाळ आणि उडीद डाळीचे भाव 110 रुपयांवर गेले आहेत. हे भाव कायम राहणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. हरभरा डाळ, उडीद डाळ, मसूर डाळ आणि मूग डाळींच्या भावातही दोन महिन्यांत सरासरी 20 रुपयांची वाढ झाली आहे.
घाऊक बाजारातील किलोचे भाव
डाळ दोन महिन्यांपूर्वी सध्याचे भाव
तूरडाळ 100 ते 110 160 ते 170
उडीद डाळ 90 110
मूग डाळ 80 ते 85 110
मसूर 58 ते 60 70 ते 72
हरभरा 57 ते 58 70