मुंबई – राज्यात शासकीय कार्यालयात आता “हॅलो’ ऐवजी “वंदे मातरम्’ने संभाषणाला सुरुवात होणार आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबतची घोषणा केली आहे. हे वर्ष भारतीय स्वातंत्र्याचं अमृत महोत्सवी वर्ष आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण होत असल्याचं औचित्य साधत मुनगंटीवार यांनी याबाबतचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यापुढे राज्यातील सरकारी कर्मचारी फोनवर संभाषण करतानाची सुरुवात “हॅलो’ने नाही तर ‘वंदे मातरम्’ने करतील.
राज्य मंत्रिमंडळाचे आज खातेवाटप जाहीर करण्यात आले. यामध्ये सुधीर मुनगंटीवार यांना सांस्कृतिक कार्यमंत्रीपदाची जबाबदारी मिळाली आहे. याशिवाय मुनगंटीवार यांना वन खात्याची देखील जबाबदारी मिळाली आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री होताच मुनगंटीवार यांनी मोठी घोषणा केली. “सांस्कृतिक विभागाचा मी पहिला संकल्प महाराष्ट्रात इथून जाहीर करतो. हॅलो नाही तर वंदे मातरम् बोला. आता चांद्यापासून ते बांद्यापर्यंत मोबाईलवरुन हॅलो ऐवजी वंदे मातरम् बोलून संभाषणाला सुरुवात करा, असे आवाहन सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
या निर्णयाची माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी ट्विटरवर देखील दिली आहे. आज मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर होऊन सांस्कृतिक खात्याची जवाबदारी येताच स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला सर्व शासकीय कार्यालयांमध्ये कर्मचारी फोनवर हॅलो न म्हणता वंदे मातरम् म्हणत संभाषणाला सुरुवात करतील अशी घोषणा केली. शासन निर्णय लवकरच निर्गमित करण्यात येईल, असे मुनगंटीवार ट्विटरवर म्हणाले.