– अॅड. प्रदीप उमाप
हिंदू, शीख, बौद्ध, पारशी, जैन, ख्रिश्चन या सहा समुदायांपैकी जे लोक भारतामध्ये स्थलांतरित झाले आहेत आणि जे गेल्या अनेक दशकांपासून भारतात राहाताहेत त्यांना भारताचे नागरिकत्व बहाल करण्यात येणार आहे.
आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच संपूर्ण देशात नागरिकत्व सुधारणा कायदा म्हणजेच सिटीझन अमेंडमेंट अॅक्ट (सीएए) लागू करण्यासाठी केंद्र सरकारने अधिसूचना काढली. 2016 मध्ये हे विधेयक लोकसभेमध्ये मांडले गेले. त्यानंतर संसदेच्या संयुक्त समितीकडे ते पाठवले गेले. या समितीने 2019 मध्ये या विधेयकाला मान्यता दिली. त्यानंतर हे विधेयक केंद्रीय मंत्रिमंडळासमोर मांडले गेले आणि आता संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये बहुमताने मंजूर झाले होते. तथापि, या कायद्यामुळे देशातील अनेक भागांमध्ये दंगली पेटल्याचे समोर आले होते. त्यामुळे सीएएच्या अंमलबजावणीची प्रक्रिया मागे पडली.
सीएए प्रत्यक्षात येण्यासाठी चार वर्षांहून अधिक काळ लोटला असला तरी पाकिस्तान, अङ्गगाणिस्तान आणि बांगलादेशातून सर्वस्व गमावून परतलेल्या लोकांसाठी हे पाऊल स्वप्नपूर्तीसारखे असेल यात शंका नाही. या कायद्यातील तरतुदींनुसार सदर तीन देशांमध्ये अल्पसंख्याक असल्याने वर्षानुवर्षांपासून छळवणुकीचा सामना करावा लागलेल्या हिंदू, शीख, बौद्ध, पारशी, जैन, ख्रिश्चन धर्मियांना भारतात आल्यास नागरिकत्व मिळणे सोपे होणार आहे.
राज्यघटनेतील तरतुदीनुसार नागरिकत्व हा पूर्णतः केंद्राच्या अखत्यारीतील विषय आहे. 1955 च्या नागरिकत्व कायद्यातील वास्तव्यमर्यादेची 11 वर्षांची अट शिथील करुन ती आता 6 वर्षांवर आणलेली आहे. तसेच हे विधेयक निर्वासितांपेक्षा देखील आश्रितांच्या संदर्भातील आहे. निर्वासित आणि आश्रित यांच्यात ङ्गरक आहे. स्वतःच्या देशात अमानवी छळाचा सामना करावा लागल्याने भारतात आश्रय मागणारे हे आश्रित आहेत; तर निर्वासित म्हणजे भारतात बेकायदेशीरपणे घुसखोरी केलेले आणि ज्यांच्याकडे कोणतेही अधिकृत कागदपत्रेही नाहीत असे लोक. यातील प्रामुख्याने आश्रितांसाठीचे हे विधेयक आहे हे मुळामध्ये समजून घ्यावे लागेल. या कायद्यान्वये केवळ बौद्ध किंवा हिंदू यांनाच नागरिकत्व दिले असते आणि इतरांना नाकारले असते तर कलम 14 चा भंग जरूर झाला असता. मात्र सहाही अल्पसंख्याकांना नागरिकत्व बहाल करण्यात येणार आहे.
प्राचीन काळापासून पाकिस्तान, बांग्लादेश हे एकाच मोठ्या भूखंडाचा भाग होते. 1947 मध्ये ङ्गाळणीनंतर पाकिस्तान वेगळा झाला. पुढे 1971 मध्ये बांग्लादेशाची निर्मिती झाली. त्यापूर्वी सर्वच नागरिक एकाच मोठ्या भूखंडाचा भाग होते. भारत-पाकिस्तान ङ्गाळणीच्या वेळी आणि बांगलादेश निर्मितीच्या वेळी या दोन्ही देशांनी भारताशी केेलेल्या द्विपक्षीय करारारानुसार आमच्याकडील अल्पसंख्याकांचे रक्षण करू अशी हमी दिली होती. 1950 मध्ये झालेल्या या करारावर भारतीय पंतप्रधान पंडित नेहरू आणि पाकिस्तानचे पंतप्रधान लियाकत अली खान यांनी स्वाक्षरी केली होती, अशी नोंद उपलब्ध आहे. भारताने या कराराचे काटेकोरपणाने पालन केले; पण पाकिस्तानात मात्र अल्पसंख्याकांना संरक्षण मिळाले नाही. गेल्या 75 वर्षांमध्ये तेथे बिगर मुस्लिम धर्मियांचा प्रचंड छळ झाला.
पाकिस्तानमध्ये मुस्लिमेतर धर्मिय तेथे अल्पसंख्याक ठरतात. यामध्ये हिंदूंचा, शीखांचा समावेश अधिक आहे. पाकिस्तानमधील अल्पसंख्याकांचे प्रमाण 1947 मध्ये 23 टक्के होते ते आता 5 टक्क्यांपर्यंत घटले आहे. याचा अर्थ असा की तेथील छळाला कंटाळून अनेक जण भारतात आश्रयाला आले. त्यांना आश्रय देणे ही भारताची नैतिक जबाबदारी असून सीएए कायद्याने भारत ती पार पाडत आहे. हा कायदा शेजारील देशांमध्ये छळ करून स्थलांतरित झालेल्या भारतीयांना न्याय्य नागरिकत्व देणारा आहे. पण या तीन देशांशी संलग्न असणार्या आसामसारख्या राज्यांमधील जनतेच्या मनातील भीती दूर करण्यामध्ये केंद्र सरकारला यश आले नव्हते.
गेल्या काही वर्षांत अङ्गगाणिस्तानातील सत्तापालटानंतर तालिबानकडून हिंदू आणि शीखांना दिलेल्या क्रूर वागणुकीमुळे, या समुदायातील बहुतेक लोक अङ्गगाणिस्तान सोडून गेले आहेत. हाच प्रकार बांगलादेशबाबत आहे. बांगलादेशचे तत्कालीन पंतप्रधान शेख मुजीबुर रहमान यांनीही भारताबरोबर करार केला होता आणि अल्पसंख्याक हिंदूना संरक्षण दिले जाईल अशी लिखित हमी दिलेली होती. त्यांच्या काळात या कराराचे पालन केले गेले. पण शेख खालिदा झिया यांचे सरकार आल्यानंतर अल्पसंख्याकांचा छळ झाला. त्यामुळे बांगलादेशातील अल्पसंख्याकांनी पळ काढला आणि ते भारतात आश्रयाला आले.
गेल्या साडेसात दशकांपासून या तिन्ही देशातील अनेक अल्पसंख्याक समुदाय भारतात राहात आहेत. त्यांना सामावून घेण्यासाठी हे विधेयक आणले गेले आहे. आज युरोपियन देशांपासून आशिया खंडातील अनेक देश निर्वासितांना सामावून घेण्यास तयार नाहीयेत. अशा स्थितीत भारत त्यांना देशाचे नागरिकत्व देऊन राज्यघटनेने दिलेले सर्व अधिकार बहाल करत आहे, ही बाब जगाला एक वेगळा संदेश देणारी आहे.