आत्महत्येसारख्या समस्येवर काही उपाय योजता येतील का, कारण एकसंध समाजासाठी हे महत्त्वाचे आहे. आत्महत्येवर मनो-सामाजिक विश्लेषण होणे गरजेचे आहे.
गेल्या काही दिवसांपासून आत्महत्येबाबत बातम्या सतत आपल्या वाचण्यात अथवा ऐकण्यात येतात. दिल्ली न्यायालयातील न्यायाधीश आणि त्यांच्या पत्नीने 29 मे 2022 रोजी घरगुती कारणांमुळे आत्महत्या केली. दोघंही उच्च शिक्षित व सुस्थितीतील होते. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे 28 मे 2022 रोजी पत्नीचा झोपेत मृत्यू झाल्याने एका अल्पशिक्षित व गरीब वृद्ध पतीने गळफास लावून आत्महत्या केली.
रत्नागिरी तालुक्यात 11 मे रोजी सोमेश्वर मडकेवाडी येथे एका मध्यमवर्गीय तरुणाने काही कारणातून गळफास घेत आत्महत्या केली. मार्च महिन्यात गेवराई तालुक्यातील हिंगणगाव येथील शेतकऱ्याने त्याच्या शेतातील ऊस गाळपाला जात नसल्याने फड पेटवून आत्महत्या केली. यापूर्वी सोयगाव येथे शेतकऱ्याच्या पत्नीने कर्जाला कंटाळून आत्महत्या केल्याची बातमी आली होती. रायगड येथे घरगुती हिंसाचाराला कंटाळून आईने सहा मुलांसह आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या घटनेत आई बचावली मुलं दगावली. नुकतेच पिंपरी चिंचवड शहरातील थेरगाव परिसरात खेळण्यातल्या बाहुलीला फाशी दिल्यानंतर स्वतःही गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.
उत्तराखंड सरकारमधील माजी मंत्र्यावर
स्वतःच्या नातीचा विनयभंग केल्याचा आरोप झाल्याने आत्महत्या केली. वरील सर्व बातम्यांमध्ये तसं पाहिलं तर भौगोलिक, आर्थिक वा सामाजिक असं कोणतेही साम्य नाही. पण तरीही त्यांची आत्महत्या करते वेळी मानसिक अवस्था जवळपास सारखीच होती.
गेल्या अनेक वर्षांपासून मनो-सामाजिक क्षेत्रात संशोधन व थेरपिस्ट म्हणून कार्यरत असल्याने या संदर्भात काहींनी विचारणा केली की आत्महत्या कशा थांबविता येऊ शकतात? आत्महत्येच्या विचारांनी ग्रासलेल्या व्यक्तीस कसे ओळखायचे? इत्यादी. त्यामुळे या विषयावर थोडक्यात मांडणी करून अधिकाधिक लोकांमध्ये जागृती व्हावी म्हणून आत्महत्या या विषयावर थोडक्यात समजून घेऊया.
इतर दुर्दैवी घटनांप्रमाणे आत्महत्या पण रोखता येऊ शकतात. आत्महत्येचे विचार सुसंवाद, चर्चा, समुपदेशन, थेरपी व उपचाराने टाळता येऊ शकतात. परंतु त्यासाठी आपण वा आपल्या जवळची व्यक्ती या विचाराने किंवा त्रासाने ग्रासला आहे हे मान्य करणं गरजेचं आहे. आत्महत्या व अनेक मानसिक आजार यावर फार मोकळ्या पद्धतीने बोललं जात नाही. त्याच्या बाबतीत असलेल्या नकारात्मकता, कलंक व निंदेचा दृष्टिकोन यामुळे यावर जास्त बोललं जात नाही. म्हणून ते विचार बाहेर निघत नाहीत. तसेच त्याचे निदान पण होत नाही. आत्महत्येसाठी मनाची नकारात्मकता, नैराश्य, भय, प्रेमभंग, विश्वासघात, हिंसा, शोषण, गैरवर्तन, आजारपण, अपयशी भावना हे सर्व घटक मोठ्या प्रमाणावर कारणीभूत असतात.
मानसिक स्वास्थ्य या विषयावर काम करणाऱ्या संघटनांच्या माहितीनुसार दरवर्षी साधारण आठ ते दहा लाख लोक आत्महत्या करतात. विशेष व लक्षणीय बाब म्हणजे यात सर्व वयोगटातील व सर्व स्तरातील लोक आहेत. आत्महत्या करणाऱ्यांच्या आकडेवारीवरून असं दिसतं की, साधारण 15 ते 30 वयोगटात आत्महत्या करण्याचं प्रमाण सर्वाधिक आहे. आत्महत्येची तात्कालिक कारणं भिन्न भिन्न असू शकतात; परंतु वर सांगितलेले घटक, मानसिक स्थिती व लक्षणं हेच आत्महत्येस कारणीभूत आहेत. बऱ्याचदा तात्कालिक कारणं व घटना कदाचित फार मोठ्या व त्रासदायक नसतात. पण त्या आधीच्या अनेक घटनांच्या मालिका व त्यानंतर त्या व्यक्तीची मानसिक स्थिती उच्च पातळीवर गेल्यामुळे ती व्यक्ती टोकाचा निर्णय घेते. त्या परिस्थीत ते स्वतःला सावरू शकले नसल्याने ते मृत्यूला कवटाळतात.
आत्महत्येच्या विचाराने ग्रस्त असलेल्या व्यक्तींमध्ये फार मोठ्या प्रमाणात बदल झालेले असतात. ते समजणं गरजेचं असतं. विरक्त भावना, कोणत्याच गोष्टींमध्ये रस नसणे, एकलकोंडेपणा, लोकांपासून दूर राहणे, मद्यपान व अंमलीपदार्थांच्या आहारी जाणे, निष्काळजी व धोकादायक वागणं, सगळं संपलं असं समजणं, त्यानुसार लोकांशी वागणं, आर्थिक व्यवहार व देणं पूर्ण करणं, पॉलिसी, मृत्युपत्र व तत्सम कागदपत्रांची जमवाजमव करणं, दान धर्म करणं, स्वतःला नुकसान पोहचविणे किंवा तसा विचार करणे इत्यादी बदल आत्महत्येच्या विचाराने ग्रस्त व्यक्तींमध्ये प्रकर्षाने जाणवतात.
दुर्दैव हे की वरील लक्षणं स्पष्ट दिसत असतानाही त्या व्यक्तीकडे फारसं लक्ष दिलं जात नाही. त्याकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे मनातील गोंधळ व नकारात्मकता बाहेर येत नाही. त्यामुळेच व्यक्तीची मानसिक कोंडी होऊन ती व्यक्ती टोकाचा निर्णय घेते. अशावेळी जवळपासच्या व्यक्तींनी किंवा दुसऱ्या कोणाच्या तरी माध्यमातून त्या व्यक्तीच्या मनातील कोंडी फोडण्यासाठी वाट मोकळी करून दिली पाहिजे. तसेच समुपदेशक, मनो-सामाजिक कार्यकर्ता, मनो-चिकित्सक यांना भेटून उपचार सुरू केले पाहिजे.