– हेमंत देसाई
आसामच्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नीला अन्नप्रक्रिया उद्योगासंदर्भात केंद्रीय अन्नप्रक्रिया उद्योग मंत्रालयाने दहा कोटी रुपयांचे अनुदान दिले असल्याचा आरोप आहे.
तरुण गोगोई हे 2001 ते 2016 पर्यंत आसामचे मुख्यमंत्री होते. ते आसाम राज्याचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिले. कॉंग्रेसचे ते ज्येष्ठ नेते होते आणि आपल्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात राज्याची आर्थिक स्थिती सुधारण्याबरोबरच, दहशतवाद संपवणे आणि शांतता प्रस्थापित करणे याचेही श्रेय त्यांच्याकडे जाते. तरुण यांनी 1991 ते 1996 आणि 1998 ते 2001 या काळात लोकसभा सदस्य म्हणून देखील काम केले. ते पी. व्ही. नरसिंह राव सरकारात अन्नप्रक्रिया उद्योग राज्यमंत्री होते.
तसेच त्यांना मरणोत्तर “पद्मभूषण’ हा पुरस्कार देण्यात आला. तरुण गोगोई यांनी 1976 मध्ये अखिल भारतीय कॉंग्रेस समितीचे संयुक्त सचिव म्हणून आणि 1985 ते 90 या काळात पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून काम केले. तरुण गोगोई यांचे चिरंजीव गौरव हे कॉंग्रेसचे लोकसभेतील उपनेते असून, आसाममधील कालीबोर मतदारसंघातून 2014 मध्ये ते प्रथम निवडून आले. गौरव हे उच्चशिक्षित असून, आधी ते “एअरटेल’ या कंपनीत मोठ्या हुद्द्यावर काम करत होते आणि त्यानंतर “प्रवाह’ या नवी दिल्लीच्या एनजीओमध्ये ते कार्यरत होते. त्यानंतर ते राजकारणात आले.
गेल्या महिन्यात गौरव यांनी नरेंद्र मोदी सरकारविरुद्ध अविश्वासाचा ठराव मांडला होता. त्यावेळी त्यांनी मणिपूरबाबत पंतप्रधानांनी कोणतेही वक्तव्य का केले नाही? तेथील मुख्यमंत्र्यांना का हाकलले नाही? आणि स्वतः पंतप्रधानांनी मणिपूरला भेट का दिली नाही? असे काही प्रश्न विचारले होते. गौरव यांच्या भाषणाचे सत्तारूढ पक्षाच्या काही सदस्यांनीही कौतुक केले होते. अशा या गौरव यांनी आसाममधील हिमंत बिस्वा सरमा यांच्याविरुद्ध तोफ डागण्यास सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री हिमंत यांच्या पत्नीला अन्नप्रक्रिया उद्योगासंदर्भात केंद्रीय अन्नप्रक्रिया उद्योग मंत्रालयाने दहा कोटी रुपयांचे अनुदान दिले असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची घोषणा मोदी यांनी केली आहे, परंतु आसामात मुख्यमंत्र्यांनी आपल्या पत्नीचेच उत्पन्न दुप्पट करण्याचे ठरवले दिसते, अशी टिप्पणी गौरव यांनी केली आहे! मात्र माझ्या पत्नीला वा तिच्या कंपनीला असे कोणतेही केंद्र सरकारी अनुदान मिळालेले नाही, असा खुलासा मुख्यमंत्र्यांनी केला आहे. “ना खाऊँगा ना खाने दूँगा’ अशी घोषणा पंतप्रधानांनी केली असली, तरी देखील वेगवेगळ्या भाजपशासित राज्यांत घोटाळे होत असल्याचा आरोप विरोधी पक्ष करत असून, आसाम हे त्याचे आणखी एक उदाहरण आहे.
हिमंत बिस्वा सरमा हे पूर्वी कॉंग्रेसमध्ये होते आणि आपल्याला डावलून गौरवला पुढे रेटले जात आहे हे पाहून ते खवळले होते.
त्यानंतर त्यांनी कॉंग्रेसचे तत्कालीन नेते राहुल गांधी यांची बदनामी करणे, त्यांच्याविरुद्ध वैयक्तिक चिखलफेक करणे, त्यांच्याबाबत अफवा पसरवणे असे उद्योग सुरू केले. मुस्लीम समाजाविरुद्ध प्रक्षोभक विधाने करण्यात त्यांचा हात कोणीही धरू शकत नाही! हिमंत हे कॉंग्रेसमध्ये असताना, भाजपने त्यांच्या विरोधात भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते. परंतु ते भाजपमध्ये आल्यानंतर अर्थातच त्यांना क्लिन चीट मिळाली आणि त्यांचे कपडे स्वच्छ झाले… हिमंत यांच्या पत्नी रिंकी भुयॉं सरमा “प्राइड ईस्ट एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीच्या प्रमुख व्यवस्थापकीय संचालक आहेत.
ईशान्येमधील ती सर्वात मोठी माध्यम कंपनी असून, तिच्या मालकीच्या दोन वृत्तवाहिन्या, एक वृत्तपत्र, एक डिजिटल वृत्तपोर्टल आणि अनेक करमणुकीच्या वाहिन्या आहेत. “प्रधानमंत्री किसान संपदा योजने’अंतर्गत अन्नप्रक्रिया प्रकल्प उभारण्यासाठी 70 संस्थांना कामे देण्यात आली असून, त्यात “प्राइड’ कंपनीचाही समावेश आहे. राज्यातील नागाव जिल्ह्यात एक प्रकल्प उभारण्यासाठी अग्रणी प्रवर्तक म्हणून रिंकी यांच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे. या प्रकल्पाची किंमत 25 कोटी रुपये असून, 10 नोव्हेंबर 2022 रोजी केंद्रीय मंत्रालयाने दहा कोटी रुपयांचे अनुदान त्यासाठी मंजूरही केले आहे.
अन्नप्रक्रिया संकुलासाठी पायाभूत आणि सामायिक सुविधा तयार करणे आणि अन्नप्रक्रिया उद्योगांसाठी अनुकूलता निर्माण करणे हे “ऍग्रो प्रोसेसिंग क्लस्टर स्कीम’चे प्रमुख उद्दिष्ट आहे. या योजनेअंतर्गत ईशान्य राज्यांमध्ये प्रकल्प खर्चाच्या 50 टक्के, परंतु जास्तीत जास्त दहा कोटी रुपयांचे अनुदान केंद्र सरकारकडून मिळते. या अनुदानातून जमीन खरेदीचा खर्च मात्र करता येत नाही. गोगोई यांनी केलेल्या आरोपाचा ठामपणे प्रतिवाद करणे मुख्यमंत्र्यांना अद्याप जमलेले नाही.
“अनुदानाची रक्कम अद्याप मिळालेलीच नाही’, असे जरी मुख्यमंत्र्यांनी म्हटले असले, तरी देखील ही रक्कम मंजूर होणे हाच नैतिक अपराध असल्याचे स्पष्ट आहे. याचे कारण, आपल्या पदाचा दुरुपयोग करून अनुदान वाटपात प्राधान्य मिळवण्यात आले आहे. रिंकी यांनी मात्र गोगोई यांच्या विरोधात बदनामीचा खटला दाखल करण्याचा इशारा दिला आहे. भाजपचे नेते कॉंग्रेस नेत्यांवर अनेकदा निराधार आरोप करत असतात. आता त्यांच्यावरच आरोप होऊ लागल्यामुळे, त्यांची पंचाईत झाली आहे! आता उद्या गौरव गोगोई यांच्याकडे ईडी वा सीबीआयची वक्रदृष्टी वळणार नाही, याची काही खात्री नाही!