स्वप्निल श्रोत्री
भारत हे सहिष्णू राष्ट्र आहे. कोणत्याही राष्ट्राच्या वाट्याला विनाकारण जाणे हा भारताचा स्वभाव नाही; परंतु जर कोणी भारताच्या वाट्याला जात असेल तर त्याला तसेच उत्तर देणे आवश्यक आहे.
जगात असे फार कमी देश आहेत ज्यांच्या भोवती आंतरराष्ट्रीय राजकारण फिरत असते. औद्योगिक क्रांतीनंतर ब्रिटन, फ्रान्स ही राष्ट्रे जागतिक राजकारणाच्या केंद्रस्थानी होती. वसाहतवादाच्या काळात ब्रिटन, फ्रान्स बरोबर ऑस्ट्रिया, स्पेन, पोर्तुगाल केंद्रस्थानी आले. पहिल्या महायुद्धाच्या वेळेस सर्बिया तर दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी जर्मनी, इटली, जपान इ. राष्ट्रांभोवती जागतिक राजकारण फिरत होते.
शीतयुद्धाच्या काळात जागतिक राजकारणाची सूत्रे सोव्हियत संघ व अमेरिकेने आपल्या हाती घेतली; पण त्याचवेळी दक्षिण आशियाचे राजकारण हे भारत व पाकिस्तान या दोन नवीन राष्ट्रांभोवती फिरू लागले.
पुढे जागतिक राजकारणात बदल होत महासत्तांचे वर्चस्व कमी झाले आणि भारत, चीन, जपान यांसारख्या क्षेत्रीय सत्ता उदयास आल्या. पुढील काळात जागतिक राजकारण हे या क्षेत्रीय सत्तांभोवती फिरू लागले. पाकिस्तानचा क्षेत्रीय सत्तेशी तीळमात्र संबंध नाही; परंतु केवळ भारत द्वेषापोटी पाकिस्तान हे राष्ट्र गेल्या 70 वर्षांपासून कायम चर्चेत राहिले आहे.
सध्याच्या आधुनिक युगात अमेरिका-रशिया संबंधांपेक्षा जास्त चर्चा ही भारत-पाकिस्तान संबंधांची केली जाते. किंबहुना अमेरिका व रशिया यांचे परराष्ट्र धोरण अनेकदा भारत व पाकिस्तान ही राष्ट्रे विचारात घेऊन आखले जाते. थोडक्यात, भारत हे जागतिक राजकारणातील असे राष्ट्र आहे जे नवनवीन गट बनवू शकते आणि बनलेले गट मोडू ही शकते;
त्यामुळे भारतावर टीका करणे किंवा भारताच्या विरोधात जाणे याचा अर्थ जागतिक राजकारणात चर्चेचा केंद्रबिंदू होणे असा आहे म्हणून टर्कीसारखी राष्ट्रे भारतावर सतत टीका करताना दिसतात.
भारत-टर्की संबंधांचा इतिहास
भारत व टर्की संबंधांचा इतिहास हा दोन कालखंडात विभागाला गेला आहे. पहिला कालखंड हा स्वातंत्र्यपूर्व कालखंड तर दुसरा कालखंड स्वातंत्रोत्तर कालखंड आहे. स्वातंत्र्यपूर्व कालखंडात भारत हा ब्रिटिशांची वसाहत असल्यामुळे भारताचे स्वतंत्र असे परराष्ट्र धोरण नव्हते. ब्रिटिश सरकार जसे आखेल त्याप्रमाणे भारताचे प्रशासन काम करीत होते. परंतु, कॉंग्रेस ही त्याकाळी भारतीयांचा चेहरा होती.
त्यामुळे कॉंग्रेसची भूमिका ही भारतीय नागरिकांची भूमिका समजली जायची. इ. स. 1920 मध्ये ब्रिटिशांनी तत्कालीन तुर्कस्तानवर पहिल्या महायुद्धात जबाबदार ठरवून जाचक अटी लावल्या. ब्रिटिशांनी तुर्कस्तानवर लावलेल्या अटींच्या निषेधार्थ भारतात मौलाना शौकत अली, मौलाना महंमद अली, हकीम अजमल खान व इतर नेत्यांनी खिलाफत चळवळीला प्रारंभ केला. महात्मा गांधींनी खिलाफत चळवळीला पाठिंबा देऊन त्यास व्यापक रूप दिले. तत्कालीन भारतातील अनेक नेते तुर्कस्तानचा सुलतान मुस्तफा कमाल पाशा अतातुर्क यांच्या संपर्कात होते.
स्वातंत्र्यावेळी पाकिस्तानची निर्मिती ही धर्माच्या आधारावर झाली असल्यामुळे स्वातंत्र्यानंतर तुर्कस्तानचे (टर्की) पाकिस्तानशी संबंध हे कायमच घनिष्ठ राहिले आहेत. भारत स्वातंत्र्यानंतरच्या सुरुवातीच्या काळात अलिप्तवादी चळवळीचे नेतृत्व करीत होता तर टर्की, पाकिस्तान ही राष्ट्रे अमेरिकेच्या गोटात होती. सोव्हियत संघाबरोबरील भारताच्या वाढत्या जवळिकीमुळे भारत-अमेरिका संबंध 90 च्या दशकांपर्यंत ताणले गेले होते.
टर्की हे अमेरिकेच्या गोटातील राष्ट्र असल्यामुळे तसेच पाकिस्तानशी घनिष्ठ संबंध असल्यामुळे भारतापासून कायमच दूर राहिले. भारत-टर्की संबंध हे स्वातंत्र्यानंतर चर्चा करण्याइतके मधुर नसले तरी कटुसुद्धा नव्हते. परंतु, गेल्या चार-पाच वर्षांतील भारत-टर्की संबंधाचा अभ्यास केला तर टीकाटिप्पणी शिवाय दुसरे काही मिळत नाही.
आज जागतिक राजकारणाचे आयाम पूर्ण बदलले आहेत. एकेकाळी टोकाचे संबंध असलेले भारत-अमेरिका जवळ आले आहेत, तर एकेकाळी अमेरिकेचा घनिष्ठ मित्र असलेला चीन आज अमेरिकेचा प्रमुख स्पर्धक आहे. टर्की आजही नाटो सारख्या अमेरिकेचे नेतृत्व असलेल्या संघटनांचा सदस्य असला तरी चीनच्या अधिक जवळ आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या काळात अमेरिका व टर्कीमधील शाब्दिक संघर्ष हा संपूर्ण जगाने पाहिला आहे.
अर्दोगन यांचे धोरण कारणीभूत
टर्कीचे विद्यमान अध्यक्ष अर्दोगन हे महत्त्वाकांक्षी नेते आहेत. अरब जगतावर आपले वर्चस्व प्रस्थापित करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. पूर्वी ज्याप्रमाणे ऑटोमन साम्राज्याचा जागतिक राजकारणात दबदबा होता तसा दबदबा पुन्हा एकदा निर्माण करून मुस्लीम जगतात नेता बनण्याच्या प्रयत्नातून अर्दोगन हे भारतावर वेळोवेळी टीका करताना दिसतात. अर्दोगन यांची इम्रान खान यांच्याशी असलेली वाढती जवळीक जागतिक व्यासपीठावर पाकिस्तान-टर्की सहकार्य दर्शवित असते.
जम्मू आणि काश्मीर, सीएए, एनआरसी यांसारख्या भारताच्या अंतर्गत विषयांवर टर्कीचे अध्यक्ष भारताला वेळोवेळी लक्ष्य करीत असल्याचे पाहून भारताने आता टर्कीला घेरण्याचा प्रयत्न सुरू केला असल्याचे दिसून येते. ज्याप्रमाणे चीन आपल्या शेजारील राष्ट्रांवर दादागिरी करण्याचा प्रयत्न करतो; त्याचप्रमाणे टर्की आपल्या शेजारील राष्ट्रांना अपमानास्पद वागणूक देताना दिसतो.
टर्कीची हीच मुजोरी हेरून भारताने टर्कीच्या शेजारी असलेल्या सायप्रस, ग्रीस, अर्मेनिया या राष्ट्रांना जवळ केल्याचे दिसून येते. गेल्या वर्षभरात भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांसह अनेक प्रमुख अधिकारी हे या राष्ट्रांच्या भेटी करून आले आहेत. पाकिस्तान, चीन, टर्की ही राष्ट्रे एकत्र येऊन भारताविरोधात गरळ ओकत असली तरी त्याने भारताचे काहीही नुकसान होणार नाही हे अर्दोगन यांना समजणे आवश्यक आहे.