नवी दिल्ली: भारत आणि नेपाळ यांचे संबंध प्राचीन काळापासून आहेत. सामाजिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि धार्मिक पातळीवरही दोन्ही देशांचे घनिष्ट संबंध असून या संबंधात कोणतीही शक्ती बाधा आणू शकत नाही. दोन्ही देशांमध्ये निर्माण झालेले गैरसमज चर्चेतून दूर केले जातील, असे भारताचे संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांनी म्हटले आहे. लिपुलेख-धरचुला रस्ता भारतीय हद्दीतच येतो, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
भारताचे नेपाळशी कधीच कडवट संबंध नव्हते. उलट अनेक शतकांपासून हे दोन्ही देश एकमेकांशी जोडले गेले आहेत. असे नमूद करून ते म्हणाले की, कोणाच्या सांगण्यावरून या संबंधात फरक पडण्याची शक्यता नाही.
दोन्ही देशांमध्ये रोटी आणि बेटीचेही व्यवहार होत आले आहेत असेही त्यांनी नमूद केले. भारताने लिपुलेख आणि धरचुला यांना जोडणारा 80 किमी लांबीचा रस्ता तयार केला आहे त्याचे 8 मे रोजी उद्घाटन झाले आहे. त्यानंतर भारत आणि नेपाळ यांच्यातील संबंधात कडवटपणा आला आहे.
नेपाळने एक घटनादुरुस्ती ठराव एकमताने संमत करून लिपुलेखसह तीन महत्त्वाचे भारतीय प्रदेश नेपाळचे असल्याचे नव्या नकाशात दाखवले आहे. त्यामुळे भारतापुढे नेपाळने एक नवीनच डोकेदुखी करून ठेवली आहे. त्यावर भाष्य करताना राजनाथसिंह यांनी म्हटले आहे की, हा वाद आम्ही एकत्र बसून सोडवू.
भारताने उभारलेल्या या रस्त्यामुळे कैलास मानससरोवर यात्रेकरूंचा प्रवासाचा कालावधी सहा दिवसांनी कमी झाला आहे. हा रस्ता नेपाळच्या हद्दीतून गेला आहे, असा आरोप नेपाळने केला आहे. पण भारताने त्यांचा हा दावा फेटाळून लावला आहे.