आंबेगाव बुद्रुक – पुणे महानगरपालिकेत आंबेगाव बुद्रुक परिसराचा समावेश होऊन चार वर्षांपेक्षा जास्त कालावधी झाल्यानंतरही येथील समस्या सुटलेल्या नाहीत. परिसराचा नियोजनबद्ध विकास होण्यासाठी आगामी निवडणुकीत तरी बाहेरचा नको, स्थानिक नगरसेवक गावाला द्या, अशी रोखठोक मागणी माजी उपसरपंच नीलेश कोंढरे यांनी केली आहे.
महापालिकेच्या आगामी पार्श्वभूमीवर तसेच प्रभाग रचना आणि आंबेगावातील समस्यांबाबत कोंढरे “प्रभात’शी बोलत होते. ते म्हणाले की, करोची तिसरी लाट येणार की नाही, यावर महापालिकेची निवडणुकीच्या तारखा ठरणार असल्याचे सांगितले जात आहे तसेच प्रभाग रचनेबाबतही अद्याप ठोस निर्णय झालेला नाही. परंतु, निवडणुकीबाबत कुठलेही निर्णय झाले तरी आंबेगावच्या समस्या पाहता गावाला बाहेरचा नाही तर स्थानिक नगरसेवकच असणे योग्य ठरणार आहे. सध्या गावचा कारभार बाहेरचा नगरसेवक पाहात आहेत. त्यांच्याकडून गेल्या चार वर्षात कुठलेही काम या भागासाठी झालेले नाही.
कोंढरे म्हणाले की, गावाचा समावेश पालिकेत झाल्यानंतर मूलभूत समस्या सुटतील, अशी आशा होती. परंतु, पालिकेकडून कुठलीही कामे झाली नाहीत. महानगरपालिका कचरा व्यवस्थापनासाठी जवळपास 500 कोटींचा खर्च करते, असे असताना घरातील कचरा उचलण्यासाठी नागरिकांना पैसे मोजावे लागत आहेत. आंबेगावातून महापालिका कर कशासाठी घेते, असा सवाल नागरिकांकडून केला जात आहे.
ग्रामपंचायतीचा कर भरल्यानंतर सरपंचासह तलाठी, ग्रामसेवकाला जाब विचारता येत होता. आता, या भागाचा नगरसेवक कोण? हेच अनेकांना अजूनही माहीत नाही तर क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी जागेवर सापडत नाहीत, अशावेळी तक्रार करायची तरी कोणाकडे, असा प्रश्न नागरिकांपुढे निर्माण झाला आहे. त्यामुळेच आगामी निवडणुकीतून गावाल बाहेरचा नको तर स्थानिक नगरसेवकच असणे गरजेचे ठरणार आहे.
महानगरपालिका प्रशासनाकडे समस्यांबाबत वारंवार पाठपुरावा करावा लागतो. परंतु, पालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करते. तसेच, नगरसेवकांचेही या भागाकडे दुर्लक्ष आहे. आगामी काळात या भागाची जाण असलेले नेतृत्व महापालिकेत पाठविणे योग्य ठरणार आहे.
– नीलेश कोंढरे,
माजी उपसरपंच आंबेगाव बुद्रुक