- परिज्ञा पुरी
मधुमेह झालेल्या व्यक्तींनी साखर खाणे/गोड खाणे टाळणे समजू शकते. मात्र, हे लक्षात ठेवले पाहिजे की, मधुमेही व्यक्तींना साखर त्रासदायक असते; साखर खाल्ल्यानेच मधुमेह होतो असे नाही. त्याची कारणे आणि लक्षणे निरनिराळी असतात. त्यामुळे साखरेविषयी सततच नकारात्मक भूमिका बाळगणे चुकीचे आहे. त्याविषयीचा हा लेख…
साखर हा भारतीय आहाराचा अविभाज्य भाग आहे. दुधाच्या पदार्थांत आणि इतर अनेक मिठायांमध्ये साखरेचा मुबलक प्रमाणात वापर होतो, जो भारतीय खाद्य संस्कृतीचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. इतका की पंचामृतात, जे आपण पूजेचे तीर्थ म्हणून घेतो, त्यातही साखर टाकतात, गूळ नाही. जर कोणी तुम्हाला साखर सोडायला सांगत असेल तर तुमचा डाएटीशियन – आहारतज्ञ बदला.
साखर भारतातून बाहेर गेली. संस्कृत शर्करापासून फारसीत शक्कर आणि अरबीत सुकर असे शब्द बनले. भारतातून साखर निर्मितीची कला शिकून चिनी लोकांनी साखर बनवायला सुरुवात केली आणि रासायनिक प्रक्रिया करून ती श्वेतवर्णीय बनवून भारतालाच विकू लागले, तेव्हा लोक साखरेस “चीनी’ म्हणू लागले.
बत्तासे हे साखरेचेच बनलेले असतात, जे आपण गुढीपाडव्याला वापरतो आणि ज्याची माळ आपण लहान मुलांना भेट देतो. यामागील शास्त्रीय कारण असे की, चैत्र महिन्यात उन्हाची धग जाणवायला सुरू झालेली असते. बत्तासे खाल्ल्यावर जास्त तहान लागते आणि माणूस भरपूर पाणी पितो आणि त्यामुळे शरीरात थंडावा निर्माण होतो. यामुळे होमिओस्टॅसिस राखण्यास शरीराला मदत मिळते. तसेच मानवी शरीरातील सर्वच पेशींचे खाद्य आहे ग्लुकोज, जे बत्ताशांमुळे भरपूर प्रमाणात उपलब्ध होते. त्यामुळे उन्हाळ्यात बाहेरून बाजारातून ग्लूकोजची पावडर आणण्याची आवश्यकता भासत नाही. आपले सण साजरे करताना किती सूक्ष्म विचार केला गेला आहे ते बघा!
दिनचर्येप्रमाणेच ऋतुचर्या हा आरोग्यदायी जीवनासाठी आयुर्वेदाने सांगितलेला उत्तम मार्ग आहे. आहार-विहार-विचार या त्रिसूत्रीत आहाराकडे सध्या प्रामुख्याने लक्ष दिले जाते. पण तो विचार अपुरा आणि त्रुटीयुक्त आहे, असं दिसतं आहे. आहार ऋतुप्रमाणे बदलला पाहिजे, पण सध्या सगळ्याच गोष्टींची कुठल्याही ऋतूत मुबलक प्रमाणात उपलब्धता असल्याने लोक ऋतुचा विचार न करता, तसेच आपल्या वर्ण-धर्माचा विचार न करता वाटेल ते वाटेल तसे खातात. वर्ण-धर्म म्हणजे आपण व्यावहारिक जीवनात काय व्यवसाय स्वीकारला आहे आणि त्यासाठी आपल्याला आपल्या शरीराचा, बुद्धीचा, मनाचा कितपत आणि कसा वापर करावा लागतो, याचा विचार करून वागणे. वर्ण-धर्म ही खूप मोठी संकल्पना आहे पण आत्ता एवढेच. वर्ण-धर्मानुसार आपल्याला आपल्या आहारात बदल करणे अपेक्षित असते, ते आजकाल होत नाहीये.
तर मुद्दा आहे साखरेचा! कुठलीही गोष्ट नियंत्रित आणि आपल्या प्रकृतीनुसार खाल्ली तर त्याचा शरीराला लाभच होतो, हे लक्षात ठेवून साखरेचा आनंदही नक्की घ्या. आपली प्रकृती काय आहे आणि आपण काय खाल्लं पाहिजे, यासाठी एखाद्या चांगल्या आयुर्वेदतज्ज्ञाला भेट द्या आणि आपला डाएट प्लॅन त्याच्याकडून बनवून घ्या. आयुर्वेदतज्ज्ञ यासाठी की तुमची प्रकृती कशी आहे, हे मॉडर्न डाएटेटिक्स शिकलेली किंवा एखादा आयुर्वेदिक न्यूट्रिशनचा कोर्स केलेली व्यक्ती सांगू शकत नाही, ते काम आयुर्वेदिक वैद्यच करू शकतात.
एखाद्या माणसाच्या प्रकृतीची चिकित्सा हा खूप मोठा विषय आहे. मात्र, मधुमेहाच्या भीतीने साखरेपासून अकारण दूर जाण्यात काही अर्थ नाही, हेच खरे.