कराड- येथील बुधवार पेठेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर शाळा क्रमांक दहाच्या नजीक कराड नगरपालिकेने संरक्षक भिंतीसाठी काढलेल्या खड्ड्यात एका चार वर्षांच्या मुलाचा बुडून मृत्यू झाला. ही घटना बुधवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. संबंधित मुलाच्या कुटुंबीयांनी आक्रोश करीत संताप व्यक्त करीत गोंधळ घातला आहे. विराट विजय चव्हाण असे त्या मुलाचे नाव आहे.
गेल्या काही दिवसापूर्वी शाळा क्रमांक 10 च्या बाजूला व डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या समोरील भागात असणाऱ्या जागेत नगरपालिकेने सुधारणा करण्याच्या हेतूने त्या परिसरातील जुनी भिंत व अन्य बांधकाम हटवले होते. त्या ठिकाणी सध्या संरक्षक भिंतीसाठीचे काम सुरू होते. मात्र, संबंधित ठेकेदाराने या ठिकाणी काम करताना कोणतीही काळजी घेतली नसल्याचे दिसून आले. या ठिकाणी जेसीबीने मोठ मोठे खड्डे काढले असून त्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. सायंकाळी या परिसरात लहान मुले खेळत होती. त्यानंतर एक मुलगा गायब झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर कुटुंबीयांनी शोधाशोध केली असता पाणी साठलेल्या डबक्यात मुलाचा मृतदेह आढळून आला.