सोलापूर – सततच्या नापिकीमुळे शेतकरी हवालदील झाला आहे. कधी दुष्काळाने तर कधी अतीवृष्टीने शेतकऱ्याचा हातातोंडाशी आलेला घास निसर्ग हिरावून घेत असल्याचे अनेकदा घडते. त्यातच एखाद्यावेळी निसर्गाने साथ दिली तर शेतकऱ्याला कृत्रीम संकटांना सामोरे जावे लागत आहे. उत्पन्न घेण्यासाठी केलेला खर्चदेखील कधीकधी भरून निघत नाही. अशातच सोलापूरातील एका शेतकऱ्याला कांदा विक्रीतून मिळालेल्या चेकची सर्वत्र चर्चा सुरु झाली आहे. 512 किलो कांद्याचे शेतकऱ्याला केवळ 2 रुपये मिळाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, बार्शी तालुक्यातील बोरगाव येथील राजेंद्र तुकाराम चव्हाण (वय 58) या शेतकऱ्याने शेतात कांदा पिकाची लागवड केली होती. 17 फेब्रुवारीला ते आपला कांदा बाजारात विकण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांचा कांदा निकृष्ट दर्जाचा असल्याचे सांगत व्यापाऱ्याने त्यांचा कांदा 1 रुपये किलो दराने खरेदी केला.
शेतकरी झालाय त्रस्त पण सरकार प्रचारात व्यस्त…
आज प्रचार संपल्याने आता तरी सरकार या प्रश्नाकडं लक्ष देईल का? pic.twitter.com/pAzfZ3Y36O
— Rohit Pawar (@RRPSpeaks) February 24, 2023
त्यानुसार चव्हाण यांना 512 रुपये मिळाले मात्र त्यातील भाडे वजा करून त्यांना केवळ 2 रुपयाचा चेक देण्यात आला. सध्या त्यांना मिळालेल्या या चेकचा फोटो सर्वत्र व्हायरल होत आहे. तर दुसरीकडे शेतकऱ्याची व्यथा पुन्हा प्रकाशझोतात आली आहे. शेतकऱ्याच्या पिकांना चांगला भाव कधी मिळेल याच अपेक्षेत शेतकरी आहेत. मात्र त्यांना योग्य दर मिळण्यासाठी अद्यापतरी कोणतेही सरकार सकारात्मक असल्याचे दिसत नाही.