औरंगाबाद – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज औरंगाबाद येथे जाहीर सभा होत आहे. या बहुचर्चित सभेसाठी काल (शनिवारी) राज ठाकरे औरंगाबादमध्ये दाखल झाले. मशिदीवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरून आक्रमक झालेल्या राज यांच्या आजच्या सभेतूनही राज्यातील सत्ताधाऱ्यांचा समाचार घेतला जाण्याची शक्यता आहे.
भोंग्यासंदर्भात राज ठाकरे यांनी आवाज उठवल्यानंतर मनसे मधील अनेक मुस्लिम पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले होते. तरीही आजच्या राज ठाकरे यांच्या होणाऱ्या सभेमध्ये मुस्लीम युवकांनी सुद्धा सहभाग घेतल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. औरंगाबाद शहरानजीक असलेल्या वाळूज परिसरातून पाचशे युवक बाईक रॅली घेऊन या सभेमध्ये सहभाग घेण्यासाठी आले आहेत. या बाईक रॅलीमध्ये मुस्लिम युवकांचादेखील मोठा सहभाग पाहायला मिळत आहे.
दरम्यान, पोलिसांनी मनसेच्या या सभेला परवानगी दिली असली तरी तब्बल 16 अटी घालून दिलेल्या आहेत. या अटींचं पालन न झाल्यास कडक कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे. तर दुसरीकडे, राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी आम्ही अंगावर केसेस घ्यायला तयार आहोत, असं म्हणत थेट पोलीस प्रशासनालाच आव्हान दिलं आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आजच्या सभेत कोणकोणते मुद्दे उपस्थित करतात आणि सरकारचा नेमका कसा समाचार घेतात, याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.