पुणे – यावर्षी सोमवारी 6 मार्च रोजी दुपारी 4 वाजून 18 मिनिटांनी चतुर्दशी समाप्ती होत असून त्यानंतर पौर्णिमा सुरू होत आहे. होळी पौर्णिमेसाठी प्रदोष काळ महत्त्वाचा असून महाराष्ट्र, कर्नाटक, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश, दिल्ली येथे सोमवारी सायंकाळी सूर्यास्तानंतर प्रदोष काळात पौर्णिमा असल्याने वरील प्रदेशात 6 मार्च ला सोमवारी होलिका दहन करावे.
मात्र 7 मार्च रोजी पौर्णिमा समाप्ती सायंकाळी 6 वाजून 10 मिनिटांनी असल्याने त्यापूर्वी सूर्यास्त होत असलेल्या प्रदेशात म्हणजे उत्तर प्रदेश मधील काही भाग, बिहार, ओरिसा, आसाम या भागात 7 मार्च ला मंगळवारी होलिका दहन करावे.
महाराष्ट्रात दाते पंचांग, राजंदेकर पंचांग, कालनिर्णय, महालक्ष्मी आदी कॅलेंडरमध्ये 6 मार्च रोजी होळी दिलेली आहे. आपण जे पंचांग किंवा कॅलेंडर गेली अनेक वर्षे वापरत आहोत त्याप्रमाणे आपले सण साजरे करावेत, असे मोहन दाते यांनी सांगितले.