बीजिंग – चीनच्या 43 मोबाईल ऍपवर बंदी घालण्याच्या भारताच्या निर्णयावर चीनने जोरदार थयथयाट केला आहे. या मोबाईल ऍपवर बंदी घालण्याचा भारताचा निर्णय जागतिक आरोग्य संघटनेच्या नियमांचा भंग होत असून भारताच्या या निर्णयाला आपला ठाम विरोध असल्याचे चीनने म्हटले आहे.
भारताने बंदी घातलेल्या 43 मोबाईल ऍपमध्ये अलिबाबा ग्रुप होल्डिंगचे ई-कॉमर्स ऍप अलीएक्सप्रेस हे लोकप्रिय ऍपदेखील आहे. याशिवाय काही डेटिंग ऍपचाही यामध्ये समावेश आहे. या ऍपमुळे देशाचे सार्वभौमत्व आणि सुरक्षिततेला धोका निर्माण होत होता, असे केंद्र सरकारच्यावतीने काल प्रसिद्धीस देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.
“या वर्षाच्या जूनपासून भारताने चार वेळा राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणाखाली चीनच्या स्मार्ट फोन ऍप्सवर निर्बंध लादले आहेत. भारताचे हे वर्तन बाजार तत्त्वांचे आणि जागतिक व्यापार संघटनेच्या नियमांचे उल्लंघन करते. चीनी कंपन्यांचे कायदेशीर हक्क आणि हितसंबंधांचे यामुळे निष्ठूरपणे अवमूल्यन होते आहे. याला चीनचा स्पष्ट विरोध आहे.’ असे चिनी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियान यांनी पत्रकारांना सांगितले.
आंतरराष्ट्रीय नियमांचे, स्थानिक कायदे आणि नियमांचे पालन करावे, असे चीन सरकारकडून नेहमीच आपल्या कंपन्यांना सांगितले जात असते. बाजाराच्या मूल्यानुसार भारत सरकारनेही या कंपन्यांच्या अधिकारांची आणि आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांच्या हितसंबंधांची जपणूक करायला हवी.
भारत आणि चीनमधील आर्थिक आणि व्यापारी संबंध परस्पर सामंजस्याचे आणि सहकार्याचे आहेत. हे संबंध बिघडू न देण्यासाठी त्वरित ऍप बंदीचा निर्णय मागे घेण्यात यावा, असेही लिजियान म्हणाले.