नेवासा – खरवंडी (ता.नेवासा) येथील सामाजिक कार्यकर्ते माऊली वालतुरे हे जालना येथील मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देऊन मराठा समाजावर झालेल्या लाठी हल्ला व मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी खरवंडी येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर चार दिवसांपासून उपोषणास बसलेले होते. तालुक्यातून या उपोषणास मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळालेला होता.
उपोषणस्थळी जिल्हा परिषद सदस्य सुनील गडाख तसेच नायब तहसीलदार तसेच शिंगणापूर पोलीस ठाण्याचे पोलीस सहाय्यक निरिक्षक निरिक्षक रामचंद्र कर्पे, शिवसेनेच्या महिला तालुका प्रमुख मीरा गुंजाळ, आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र आघाव, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे तसेच पंचक्रोशीतील गावातील सरपंच व पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थांनी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित राहून वालतुरे यांच्या उपोषणाला पाठिंबा दर्शविलेला होता.
तसेच तालुक्यातील युवक मुस्लिम संघटनेने मोठ्या संख्येने येऊन या उपोषणास पाठिंबा दिलेला होता. परंतु माऊली वालतुरे यांची प्रकृती खूपच खराब झाल्यामुळे शनिवार (दि.९) रोजी सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन आपले उपोषण थांबवण्याचा आग्रह धरला.
माऊली वालतुरे उपोषण थांबवण्यास नकार देत होते. परंतु ग्रामस्थांच्या आग्रहाखातर तहसीलदार संजय बिरादार यांच्या विनंतीनुसार वालतुरे यांनी आपले उपोषण चौथ्या दिवशी अखेर मागे घेतले. या उपोषणाला युवा सामाजिक कार्यकर्ते राहुल फाटके, भाऊराव तांबे, भानाभाऊ सोनवणे, मुकुंद भोगे, गणेश फटके, चंद्रशेखर म्हस्के, पोलीस पाटील संदीप फाटके, नामदेव वालतूरे वसंतराव लिपाने व सर्व ग्रामस्थांनी पाठिंबा दिलेला होता.