नवी दिल्ली – जी-20ची थीम “एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य आहे. परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रत्यक्षात “वन मॅन, वन गव्हर्नमेंट, वन बिझनेस ग्रुप’ ही संकल्पना देशात राबवीत आहे, असे म्हणत कॉंग्रेसने अदानी समुहावरील आरोपांवरून शनिवारी पुन्हा एकदा मोदी सरकारवर निशाणा साधला.
कॉंग्रेस सरचिटणीस जयराम रमेश यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, “जी-20′ शिखर परिषद दिल्लीत सुरू होत असताना भ्रष्टाचार आणि मनी लॉंड्रिंगला आळा घालण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाला गटबाजीच्या मागील बैठकींमध्ये मोदींनी केलेल्या अनेक उपदेशांची आठवण करून देण्यासारखे आहे.
2014मध्ये झालेल्या ब्रिस्बेन येथील जी-20 बैठकीत नरेंद्र मोदी यांनी आर्थिक गुन्हेगारांना सुरक्षित आश्रय आणि बिनशर्त प्रत्यार्पण करण्यासाठी जागतिक सहकार्याचे आवाहन केले होते. तसेच 2018मध्ये फरार आर्थिक गुन्ह्यांवर कारवाई आणि मालमत्ता पुनर्प्राप्तीसाठी नऊ-सूत्री अजेंडा सादर केला होता. पण प्रत्यक्षात तेच भ्रष्ट उद्योगपती आणि नेत्यांना आश्रय देत आहेत.
देशातील बंदरे, विमानतळ, वीज आणि रस्ते यांसारखे सरकारी क्षेत्र त्यांच्या जवळच्या मित्रांसाठी आणि अदानींसाठी मक्तेदारी ठरत आहेत. तसेच हिंडेनबर्ग अहवालानंतर अदानी समुहाविरोधातील सर्व तपासण्या पद्धतशीरपणे रोखल्या जात आहेत, असा आरोपही त्यांनी केला.