मुंबई – महाराष्ट्राचा स्टार फलंदाज व चेन्नई सुपर सिंग्जचा सलामीवीर फलंदाज ऋतूराज गायकवाड यंदाच्या आयपीएल स्पर्धेत सलग तीन सामन्यांत अपयशी ठरला. मात्र, तरीही संघाचा कर्णधार रवींद्र जडेजा याने त्याचे समर्थन केले आहे. सध्या ऋतूराजवर दडपण आहे, त्याला वेळ देण्याची गरज आहे, तो निश्चितच यश मिळवेल, असा विश्वासही जडेजाने व्यक्त केला.
ऋतूराजला यंदाच्या आयपीएल स्पर्धेत एक सलामीवीर म्हणून आपली चमक दाखवता आली नाही. तो सध्या प्रचंड मानसिक तणावाखाली आहे. त्याच्या धावा होत नसल्याने त्याच्यावर टीका होत आहे. मात्र, एक संघ म्हणून मला त्याची चिंता नाही कारण तो एक चांगला खेळाडू आहे व त्यालाही त्याच्या वैयक्तीक कामगिरीची काळजी आहे. त्याच्यावर आणखी दडपण टाकण्यापेक्षा त्याच्यावर विश्वास ठेवणे महत्वाचे आहे, तरच तो थाटात पुनरागमन करेल, असेही जडेजा म्हणाला.