खा. रणजीतसिंह, आ. जयकुमार गोरे यांचे ठराव वैध
सातारा – सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीसाठी तयार केलेल्या कच्च्या मतदारयादीत माढा लोकसभा मतदारसंघाचे खा. रणजीतसिंह नाईक निंबाळकर, माण-खटाव विधानसभा मतदारसंघाचे आ. जयकुमार गोरे यांचे पाणीपुरवठा मतदारसंघातील ठराव जिल्हा बॅंकेने अपात्र यादीत टाकले होते.
त्यावर दोघांनी कोल्हापूर येथे विभागीय सहनिबंधकांकडे हरकत दाखल केली होती. त्याची मंगळवारी सुनावणी होऊन दोघांचे ठराव वैध ठरवण्यात आले आहेत. त्यामुळे खा. रणजीतसिंह व आ. गोरे यांना रोखण्याचे राष्ट्रवादीचे मनसुबे फोल ठरले आहेत.
याबाबत मिळालेली माहिती अशी, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीसाठी मतदारयादी अंतिम करण्याची प्रक्रिया सुरू आहे. यामध्ये एक हजार 963 मतदारांची कच्ची यादी तयार करून बॅंकेने ते सहनिबंधक कार्यालयास पाठवली होती.
ही यादी प्रसिद्ध करून त्यावर आक्षेप व हरकती मागवण्यात आल्या होत्या. कच्च्या यादीवर 46 हरकती दाखल करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये खा. रणजीतसिंह नाईक निंबाळकर आणि आ. जयकुमार गोरे यांच्या नावांचे पाणीपुरवठा संस्थेतील ठराव बॅंकेने अपात्र यादी टाकले होते.
त्याला दोन्ही नेत्यांनी आक्षेप घेऊन विभागीय सहनिबंधकांकडे हरकती दाखल केल्या होत्या. त्यावरील सुनावणीत दोन्ही ठराव वैध ठरवत मतदारयादीत समाविष्ट केले आहेत. त्यामुळे दोन्ही नेत्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.