आळंदी, दि. 7 (वार्ताहर) -एका बाजूने जल संसाधन मर्यादित आहे व दुसऱ्या बाजूने या मर्यादित संसाधनाला प्रदूषित करण्याचा माणसाने सपाटा चालविला आहे, या दुहेरी कात्रीत जलसाठे सापडले आहेत. प्रत्येक गावातील सांडपाणी नद्यात विसर्जन करणे हा आज स्थयीभाव झालेला आहे. त्यामुळे पाण्याची शुद्धता अणि पर्यावरणाचा दर्जा टिकवून ठेवणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. विश्वास येवले यांनी केले.
जलदिंडी प्रस्थान श्रीक्षेत्र अलंकापुरीतून पंढरपूरकडे प्रस्थान गुरुवर्य मारुती महाराज कुऱ्हेकर यांच्या हस्ते उद्घाटन होऊन झाले, त्यावेळी डॉ. येवले बोलत होते. जलदिंडीचा सुरुवात उर्ध्व भीमा खोऱ्यातील भीमा नदीपासून होवून विविध बंधाऱ्यांतून, छोट्या धरणांमधून वाट काढत 450 किलोमीटरचा प्रवास या माध्यमातून पार पाडला जातो. ही दिंडी दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात मार्गस्थ होते आणि याद्वारे नदी काठावरील जनतेशी संपर्क साधण्याचे एक प्रभावी माध्यम ती उपलब्ध करून देते. दरवर्षी या दिंडीत सहभागी होणाऱ्यांची संख्या भरपूर वेगाने वाढत चालली आहे. शास्त्रज्ञ, विद्यार्थी, तंत्रज्ञ, डॉक्टर्स, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते आदींच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. नदीकाठावरील जनतेत आरोग्य आणि सांस्कृतिक विकास या संदर्भात होत असलेले बदल लाक्षात येण्यास सुरुवात झाली आहे.