सुपा -शिरुर येथील युवा व्यावसायिक आदित्य संदिप चोपडा गेल्या दोन – तीन दिवसांपासून बेपत्ता होता. आज बुधवारी दुपारी त्याचा मृतदेह नारायणगव्हाण येथील महामार्गालगतच्या विहिरीत आढळून आला. चोपडा यांच्या नातेवाईकांनी महामार्गावर आक्रोश करून नगर-पुणे रस्त्यावरच नवले मळा येथे रास्ता- रोको आंदोलन केले. या प्रकरणाचा तपास लावण्याचे पोलिसांनी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
पारनेर तालुक्यातील कडूस येथील मुळचे रहिवासी असलेला चोपडा परिवार व्यावसायानिमित शिरुर (जि. पुणे) येथे स्थायिक झाला आहे. परिवारातील युवा उद्योजक आदित्य चोपडा हा गेल्या दोन-तीन दिवसांपासून बेपत्ता झाला होतो. तशी फिर्याद कुटुंबीयांनी सुपा पोलीस ठाण्यात दिली होती. पोलिसांनी गुन्हा दाखल करू तपास सुरू केला होता.
बुधवारी दि.29 सप्टेंबर रोजी दुपारी काही तरुण बबन धोंडीबा नवले यांच्या विहिरीजवळ गेले असता तेथे एक मृतदेह विहिरीत तरंगताना दिसला. त्यांनी तात्काळ ही माहिती नागरिक व सुपा पोलिसांना दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत स्थानिकांच्या मदतीने मृतदेहाला विहिरीतून बाहेर काढले. ओळख पटली असता मृतदेह चोपडा याचा असल्याचे स्पष्ट झाले. याबाबत तात्काळ नातेवाईकांना कळविण्यात आले.
चोपडा याचे नातेवाईक तेथे आल्यावर त्यांनी आक्रोश करीत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यानंतर नातेवाईकांनी नगर- पुणे महामार्गावर नवले मळा येथे रास्ता रोको आंदोलन केले. मोठ्या संख्येने नातेवाईक व मित्रपरिवार जमा झाल्याने नगर-पुणे महामार्ग बंद होवून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. तपास योग्य दिशेने केला जाईल असे आश्वासन पोलिसांनी दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
सुपा पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह पुढील तपासणीसाठी पारनेर ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला. उशीरापर्यत गुन्हा नोंदविन्याचे काम चालु होते. व्यवसायाने सिव्हिल इंजिनिअर असल्याने अनेक गावात बिल्डिंग क्षेत्रात आणि इतर कोणतेही बांधकामात अग्रेसर असलेल्या आदित्य चोपडाचा मृतदेह विहिरीत सापडल्याने तालुक्यात एकच खळवळ उडाली आहे.
आदित्यने आत्महत्या केली की त्याची हत्या करण्यात आली. याबाबत सुपा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीनकुमार गोकावे यांच्या मार्गदर्शनाखाली सुपा पोलीस तपास करीत आहेत.