प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 3 -कामाच्या वेळेत चहापान तसेच गप्पांसाठी पालिकेच्या आवारात भटकणाऱ्या कर्मचाऱ्यांना आता लगाम बसणार आहे. कार्यालयीन वेळेत या कर्मचाऱ्यांना कामाव्यतिरिक्त जागा सोडण्यास मनाई करण्यात आली असून कामगार कल्याण विभाग दिवसभरात केव्हाही-कोणत्याही कार्यालयाची तपासणी करणार आहे. तसेच, या तपासणीच्या वेळेत संबंधित कर्मचारी कामा व्यक्तिरिक्त बाहेर गेलेला आढळल्यास त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे.
महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे यांनी या बाबतचे आदेश काढले आहेत. राज्यशासनाच्या धर्तीवर महापालिका कर्मचाऱ्यांनाही पाच दिवसांचा आठवडा निश्चित करण्यात आला आहे. त्यासाठी दैनंदिन कामकाजाचा पाऊण तास वाढविण्यात आला असून, सकाळी पावणेदहा ते सायंकाळी सव्वासहा ही कार्यालयीन वेळ निश्चित करण्यात आली आहे. मात्र, प्रशासक नियुक्त झाल्यापासून महापालिकेत नगरसेवकांचा वावर कमी झाला आहे. तर, नगरसेवक नसल्याने नागरिक स्वत:ची कामे घेऊन येत आहेत. अनेक विभागातील कर्मचारी सकाळी वेळेत येत नसल्याने नागरिकांना ताटकळत रहावे लागते. तर दुपारी जेवणाची वेळ दोन ते अडीच अशी अर्धाच तास असताना कर्मचारी दीड वाजताच जेवणास जातात आणि तीन ते साडेतीन वाजेनंतरच कार्यालयात येतात. संध्याकाळीही सव्वासहा वाजता कार्यालयातून बाहेर पडणे अपेक्षित असताना 5 वाजल्यापासूनच अनेक जण घरी जाण्याच्या तयारीत घुटमळत असतात.
सामान्य नागरिक मेटकुटीला
पालिकेत दररोज शहरी गरीब योजना, मिळकतकर, बांधकाम विभाग, आरोग्य विभाग, घनकचरा व्यवस्थापन विभागात, सामान्य प्रशासन विभाग, पाणी पुरवठा विभाग, मालमत्ता व्यवस्थापन विभागात वेगवेगळ्या चौकशा तसेच अर्ज करण्यासाठी येत असतात. मात्र, कर्मचारी जागेवर नसल्याने या नागरिकांना एका कार्यालयातून दुसऱ्या कार्यालयात हेलपाटे मारावे लागतात. तर वेळेत आल्यानंतरही अनेकदा “साहेब नाहीत’ असे सांगत या नागरिकांना बसवून ठेवले जाते. तर, तक्रार केली तर आपले काम होणार नाही म्हणून नागरिक हा त्रास सहन करत आहेत.