पुणे, दि. 2 -शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी शहरातील बीआरटी मार्ग बंद करण्याची मागणी केली होती. मात्र, बीआरटी ही शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असलेल्या पीएमपीचा महत्वाचा घटक असून, ती कोणत्याही स्थितीत बंद केली जाणार नसल्याचे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी गरज भासल्यास बीआरटी मार्गातून शालेय विद्यार्थी वाहतुकीच्या बस, एसटी तसेच अत्यावश्यक सेवांच्या वाहनांना प्रवेश देण्याबाबत सर्वांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
करोनाच्या दोन वर्षांनंतर शहरात यंदा बाजारपेठेत लक्षणीय गर्दी होती. मात्र, शहरात उलाढाल वाढत असतानाच दिवाळीच्या दोन आठवडे आधीपासूनच शहरात प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. ही कोंडी फोडण्यासाठी महापालिका आणि पोलिसांकडूनही विशेष लक्ष न दिल्याने दोन्ही यंत्रणांना मोठ्या प्रमाणात टीकेचा सामना करावा लागला. त्यानंतर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आमदारांनी या कोंडीवरून प्रशासनाच्या कारभारावर टीका केल्याने वाहतूक पोलिसांना दहा दिवस कारवाई बंद ठेऊन वाहतूक नियोजन करण्याचे आदेश देण्यात आले. तसेच पोलीस आयुक्तांनी वाहतूक पोलिसांच्या मदतीला 300 अतिरिक्त कर्मचाऱ्यांची फौजही दिली.
मात्र, हे सुरू असतानाच महापालिकेने पोलीस आयुक्तांना पत्र पाठवित पोलिसांनी वाहतूक नियमन करावे तसेच गर्दीच्या वेळी जड वाहनांना बंदी घालावी, अशी सल्लावजा सूचना दिली. त्यानंतर पोलीस आयुक्तांनीही शहरातील 28 रस्त्यांवर असलेल्या तब्बल दीडशे खड्ड्यांची यादी पालिका आयुक्तांना पाठविली. त्यानंतर वाहतूक कोंडीचे खापर बीआरटी मार्गावर फोडत ती बंद करण्याची मागणी केली.
पोलिसांच्या मागणीनंतर महापालिकेनेही पीएमपीएमएलला पत्र पाठवित बीआरटी बंद करण्याबाबत विचारणा केली. मात्र, पीएमपीने हा मार्ग बंद करण्यास साफ नकार दिला. बीआरटी ही सार्वजनिक वाहतुकीच्या सुविधेसाठी असल्याने ती बंद करू नये, अशी भूमिका घेतली. त्यामुळे पीएमपीची मागणी योग्य असल्याचे नमूद करत महापालिका आयुक्तांनी बीआरटी बंद केली जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.